अहमदाबाद | Ahmedabad
अहमदाबाद-आयपीएलच्या १८ व्या हंगामात आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा सामना होणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अंतिम फेरीसाठी २ संघ निश्चित झाले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल ट्रॉफीसाठी आज मंगळवारी महामुकाबला होत आहे. अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या संघाची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी याआधी अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र त्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे कोणता संघ १८ वर्षांची प्रतिक्षा संपवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने क्वालिफायर १ सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवून अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं होतं. आरसीबीने पहिल्याच झटक्यात फायनलमध्ये धडक दिली. तर दुसऱ्या बाजूला पराभूत झाल्यानंतरही पंजाबला फायनलमध्ये पोहचण्याची अधिकची संधी मिळाली. पंजाब साखळी फेरीनंतर टॉप २ मध्ये असल्याने ही संधी मिळाली.
पंजाब पहिल्या फेरीत अपयशी ठरली. मात्र पंजाबने दुसऱ्या संधीचं सोनं केलं आणि फायनलमध्ये धडक दिली. पंजाबने एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सला पराभूत करणाऱ्या मुंबई इंडियन्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. यासह अंतिम फेरीतील दुसरा संघही निश्चित झाला. त्यामुळे आता आयपीएल ट्रॉफी कोणता संघ जिंकणार? याचीच चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांच्यासह इतर सेवा प्रमुख, अधिकारी आणि जवानांना अहमदाबादमध्ये आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
८ मे रोजी धर्मशाळा येथे होणारा पंजाब-दिल्ली सामना पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे मध्यंतरी थांबवण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी, बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलले. युद्धबंदीच्या घोषणेनंतर, बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित १६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. ऑपरेशन सिंदूरपासून, बीसीसीआयने सातत्याने सशस्त्र दलांशी एकता दाखवली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर १६ आयपीएल सामने खेळवण्यात आले. बहुतेक सामन्यांमध्ये राष्ट्रगीत वाजवले गेले.
तसेच स्टेडियममधील महाकाय स्क्रीनवर मधन्यवाद, सशस्त्र दल असा संदेश दाखवण्यात आला. पूर्वी आयपीएलमध्ये राष्ट्रगीत वाजवले जात नव्हते. आयपीएल सामन्यांमध्ये राष्ट्रगीतची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाबचे सह-मालक नेस वाडिया यांनीही २०१९ मध्ये ही मागणी मांडली होती. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला याबाबत पत्रही लिहिले.