मुंबई | Mumbai
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असून रणनीती आखण्यासही सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका काहीही करुन आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असली तर, ठाकरेंच्या ताब्यातून बीएमसी जाऊ न देण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाचा आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांना देखील वेग आला आहे.
याच पार्श्वभुमीवर मनसेकडून आजच मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. तसेच, शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांचे आपापासातील हेवेदावे विसरुन वाद न करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या या पावित्र्यानंतर आता भाजपानेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
भाजप महायुतीने ५१ टक्के मतदानाची तयारी केली आहे. विधानसभेत सुद्धा आम्हाला 51.78 टक्के मतं मिळाली आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काय तयारी केली ती मला माहिती नाही. पण, आमची तयारी झाली आहे. कोणीही आले आणि लढले तरीही 51% मत महायुती घेणार आहे, असा प्रबळ विश्वासच भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवला. यावेळी, एकही जागा काँग्रेस किंवा शरद पवार आणि ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार नाही. कारण जनतेने स्वीकारला आहे की, नरेंद्र मोदी हे देशाला समृद्ध करत आहेत. तर देवेंद्र फडणवीस ते महाराष्ट्राला विकसित करत आहेत. त्यामुळे, जनता विकासासोबत जाणार आहे, असा विश्वास बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत व्यक्त केला आहे.
उद्या निवडणुका लागल्या तरीही तयार
ठाकरे बंधुंच्या युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नाही, ते लोक असे विधान करतात. आम्ही उद्या निवडणुका लागल्या तरीही तयार आहोत. महाराष्ट्रात 1 कोटी 51 लाख सदस्य असणारा भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तयार आहेत. ते काय करणार हे माहित नाही, मात्र आमची तयारी पक्की आहे असेही बावनकुळे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




