Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याधार्मिक नगरीचे रुपांतर होतंय ‘क्राईम सिटी’त; वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती

धार्मिक नगरीचे रुपांतर होतंय ‘क्राईम सिटी’त; वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती

नाशिक | फारूक पठाण | Nashik

धार्मिक,आध्यात्मकी शहर म्हणून जगभर प्रसिध्द असलेल्या नाशिक (Nashik) नगरीची ओळख आता ‘क्राईम सिटी’ (Crime City) म्हणून होत आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. मागील काही महिन्यांपासून शहरात सतत खुनाचे (Murder) सत्र सुरू असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगदी किरकोळ कारणांवरुन खून होत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांना अटोक्यात आणण्यासाठी अधिक कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे…

- Advertisement -

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Police Commissioner Ankush Shinde) यांनी शहरातील शांतता कायम रहावी व गुन्हेगारांना अटोक्यात ठेवण्यासाठी विविध प्रकारचे नियोजन केले आहे. त्याचा चांगला परिणामही दिसून येत आहे, मात्र मागील काही महिन्यांमध्ये अचानक हाणामारी, वाहनचोरी, घरफोडी, शांतता भंग या सारख्या गुन्ह्यांबरोबर खुनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरातील एकूण १३ पोलीस ठाण्यांमध्ये (Police Stations) अंबड पोलीस ठाणे सध्या हॉटस्पॉट बनला आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोड पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे, व सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील गुन्हेगारांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. उपनगर भागात गेल्या महिन्यातच वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या.

तर नवीन नाशिक परिसरातील शिवशक्ती चौकात एका रात्रीत १६ वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून अंबडमध्ये गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. अंबड येथील चुंचाळे शिवारात एका टोळीसोबत झालेल्या किरकोळ वादातून दोन चुलत भावांना चाकूने प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या अवघ्या एक आठवड्यानंतर महालक्ष्मीनगर, अंबड येथे एकावर चाकू हल्ला झाला.तर २४ ऑगस्ट रोजी शिवाजी चौकात संदीप आठवलेचा खुन झाला. त्यानंतर पुन्हा गंगापूर रोड भागात एका तरुणाचा खुन झाला.अशाप्रकारे लागोपाठ खुनाचे सत्र सुरू झाल्याने नवीन नाशिक भागासह शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुन्हेगारांवर वचक नाही

दहशत निर्माण करणार्‍या गुंडांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत असून, हे गुंड पोलिसांनाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरात दोन आठवड्यांत चार खून झाले असून गुंड पोलिसांना जुमानत नसल्याने पोलिसांनी अजून कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरात दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडत असून, खून, हाणामार्‍या, भीतीदायक प्रकार, रस्त्यावर लाठ्याकाठ्या घेऊन फिरणे, रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे, जोरजोरात ओरडत बाईकवरून फिरणे, आरडाओरड करणे, शिवीगाळ करणे असे उद्योग सर्रास सुरू आहे. त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये जाऊन मद्यप्राशन करणे, बिलाच्या वेळी हॉटेल मालकाशी वाद घालणे, त्याला शिवीगाळ, मारहाण करणे हे प्रकार देखील वाढले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या