माळशिरस । Malshiras
विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election 2024) ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाचा घोळ झाल्याचा आरोप माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज (३ डिसेंबर) मारकडवाडी गावात अभिरुप बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडणार होती. यासाठी ग्रामस्थांनी गावामध्ये पाच बूथ निर्माण करुन मतदान केंद्रावर मतदान पेट्या, शिक्के, मतपत्रिका हे सर्व साहित्य आणलं होतं.
मात्र, पोलीस प्रशासनानं गावात जमावबंदी लागू असताना जर मतदान झालं तर लोकांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा दिला. तसंच यानंतर जे काही घडेल याची पूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार उत्तम जानकर यांची असेल, असंही पोलीस म्हणाले. पोलिसांच्या इशाऱ्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली.
जमाबंदीच्या आदेश असल्याने आणि प्रशासनाचा दबाव असल्याने आम्ही वेगळ्या मार्गाने न्याय मिळवू असे जानकरांनी म्हटले आहे. तसेच शालेय मुलांचे आणि इतर कोणाचाही नुकसान होऊ नये गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा घेतला निर्णय घेतल्याचे जानकरांनी म्हटले आहे. मतदान प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा करताना जानकरांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
ते म्हणाले की, मारकडवाडीतील गावकऱ्यांनी आज बॅलेटपेपवरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिस प्रशासनाने बॅलेट पेपरवर मतदान करण्यास परवानगी दिली नाही. मतदानासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती पण मतदान करण्यासाठी येणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू असे पोलिसांनी सांगितले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून दबाव येत असल्यामुळे ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आल्याचे आरोप जानकरांनी केले आहेत.