बारामती | Baramati
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. अशामध्ये अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर अनेकदा व्यक्त केल्या आहेत. सोमवारी (2 फेब्रुवारी) रोहित पवार यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार? अशी चिंता त्यांनी यामध्ये व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो, त्यांचं किती नुकसान होतं हे गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहतोय. सध्या अनेक लोकं भेटतायत आणि मा. अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतात. हे लोकं फक्त राष्ट्रवादी काँग्रस पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित आहेत असं नाही तर सामान्य माणसं आहेत, पण अजितदादांमुळं त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन झालं, अजितदादांनी त्यांचं कोणतं काम केलं, कशी मदत केली हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरणं कठीण होतं. हे अनुभवत असताना मा. अजितदादा किती मोठे होते आणि त्यांच्या जाण्याने किती नुकसान झालं, समाजमनावर दुःखाची किती मोठी छाया पसरली, हे दिसतं.
रोहित पवार पुढे म्हणतात, म्हणतात ना की, माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. अजितदादांचं मोठेपण माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तीला तर पहिल्यापासूनच माहित होतं, पण त्यापेक्षाही अजितदादा किती मोठे होते हे मलाही आता पुन्हा नव्याने अनुभवायला मिळतंय. अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झालीत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आलीय. ती आम्ही आमच्यापरिने नक्कीच निभावू पण तरीही प्रश्न उरतो की, अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरुन काढणार?
दरम्यान, राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना शरद पवार यांनी सांगितले की, चार महिन्यांपासून विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. विलीनीकरणाची घोषणा १२ तारखेला होणार होती. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे या प्रक्रियेला खंड पडला. या चर्चामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नव्हतो. अजितदादा, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे सातत्याने यात होते. दोन्ही पक्षांमध्ये एकत्र काम करण्याबाबत एकमत होते. दादांची इच्छा होती की, पक्ष एकत्र यावेत. ती इच्छा पूर्ण व्हावी, ही आमचीही इच्छा आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले.





