राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
अहमदनगर जिल्ह्यात मालमत्ताविषयक गुन्ह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आता विशेष न्यायालयात सागर भांड टोळीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी मयूर दिलीप देवकर यांनी गु. र. नं 711/21 कलम 395, 397, 341, 506 आर्म अॅक्ट 4/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा कुख्यात सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागर भांडसह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली. सागर भांड टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटितपणे बेकायदेशररित्या हिंसाचाराचा वापर करून, धमकी देऊन तसेच धाक दपटशहा दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांडचे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते. तरी देखील गुन्हेगारास कुठल्याही प्रकारची सहानुभूती न दाखविता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न अहमदनगर पोलिसांकडून करण्यात आला आहे.
गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांना सादर केला होता. प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला. सागर भांडविरुद्ध दरोडा, अपहरण, फसवणूक, अवैध शस्त्र वापर असे तब्बल 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर टोळीतील सदस्य निलेश शिंंदेवर 7, नितीन माळीवर 4, रवी लोंढेवर 3, रमेश शिंदेवर 5, गणेश माळीवर 5 असे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा कट रचून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने 120( ब), गुन्हा करून पुरावे नष्ट केले म्हणून 201 भा.दं.वि.कलमाप्रमाणे तपासी अधिकारी यांच्याकडून या गुन्ह्यास वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.
या गुन्ह्यात कुख्यात सागर भांड टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999चे कलम 3(1) (ळळ) ,3(2), व 3(4)(मोक्का) अन्वये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी मिळाली. संदीप मिटके यांनी गुन्ह्याचे दोषारोपपत्र विशेष मोक्का न्यायालयात दाखल केले आहे.