शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थानला (Sai Baba Sansthan) मंगळवारी सकाळी आठ वाजता एक ई-मेल (E Mail) प्राप्त झाला, ज्यामध्ये साई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची धमकी (Bomb Threat) देण्यात आली होती. या ई-मेलमध्ये शिर्डी साई मंदिरात (Sai Temple), खोल्यांमध्ये 4 नायट्रिक इम्प्रोव्हाइज्ड ईडी (स्फोटके) लावण्यात आली आहेत. दुपारी 1 वाजता ती सक्रिय होतील, सर्व भाविकांना, कर्मचार्यांना बाहेर काढा! असा मजकूर होता, ज्यामुळे सुरुवातीला खळबळ उडाली. मात्र संस्थानच्या सुरक्षा विभागाच्या कसून तपासणीनंतर हा प्रकार खोड़साळपणाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या 2 मे रोजी सुद्धा असाच मेल आला होता, तोही खोडसाळपणा होता, त्याच परिसरातून किंवा त्याच व्यक्तीने नाव बदलून हा मेल केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ई-मेल सकाळी प्राप्त झाला असला, तरी कार्यालये सुरू झाल्यानंतर सकाळी 10:30 वाजता तो निदर्शनास आला. यानंतर साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला.
अहिल्यानगरहून (Ahilyanagar) डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने शिर्डीत (Shirdi) दाखल झाले. यानंतर स्थानिक पोलीस आणि संस्थान सुरक्षा विभागाच्या कर्मचार्यांनी कोणतीही घबराट पसरणार नाही याची काळजी घेत मंदिर परिसर आणि भक्त निवासांची कसून पाहणी करण्यात आली, परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. या धमकीचा उद्देश खोड़साळपणा आणि भीती निर्माण करणे असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. धोकादायक मजकूर असलेल्या या ई-मेल आयडी खाली भगवंत मन्न हे नाव प्रेषक म्हणून नमूद आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (SP Somnath Gharge) यांनी शिर्डीला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपअधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहाय्यक निरीक्षक येसेकर आदी उपस्थित होते. याप्रकरणी साई संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून धमकी देणार्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान या धमकीचा भाविकांवर कोणताही परिणाम झाला नाही किंवा तपासणीमुळे कोणी विचलीतही झाले नाही. दर्शन व्यवस्था नेहमीप्रमाणे सुरळीत आणि शांततेत सुरू होती. दुसर्या दिवशी गुरुवारी सकाळी माध्यमांना माहिती देण्यात आली. भाविकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे सीईओ गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे.




