संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
संगमनेर तालुक्यातील कर्जुलेपठार येथे शेतात शौचास गेलेच्या कारणावरून वाद उफाळून आल्याने एका विवाहित महिलेचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला तर तिची नणंदही गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अजित दादाभाऊ वाघ यांनी फिर्याद दिली आहे. कर्जुलेपठार येथे अजित वाघ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे घराशेजारी मुरलीधर रामकृष्ण पडवळ हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. वाघ यांच्या घरात शौचालय नसल्यामुळे घरातील सदस्य शेजारी असलेल्या पडवळ यांच्या शेतात शौचास जात असतात. मंगळवारी (दि. 10 रोजी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अजित वाघ यांच्या भावजयी रुपाली वाघ शौचासाठी शेतात गेल्या असता, तिथे विक्रम मुरलीधर पडवळ यांनी त्यांना शेतात येण्यास विरोध करत शिवीगाळ केली.
काही वेळानंतर अजित वाघ, त्यांचे भाऊ ज्ञानदेव, भावजयी रुपाली व बहिण मोनिका वाघ यांनी पडवळ कुटुंबाशी चर्चा करून समजावण्यासाठी त्यांच्याकडे गेले. त्यावेळी मुरलीधर पडवळ, त्याचा मुलगा विक्रम व सून अलका यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली. वाद विकोपाला गेल्यावर विक्रम पडवळ याने घरातून चाकू आणून अलकाने रुपाली यांचे हात पकडले आणि विक्रमने तिच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केले. बहिण मोनिका मदतीस गेली असता तिच्यावरही चाकूने कंबरेवर वार करण्यात आला.
जखमींना तत्काळ साकुर फाट्याहून रुग्णवाहिकेमधून संगमनेर येथे खासगी हॉस्पिटला उपचारासाठी नेण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी दोघींना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रुपाली वाघ यांचा काल रात्री 12.30 च्या सुमारास मृत्यू झाला. मोनिका वाघ यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर अजित वाघ यांच्या फिर्यादीवरून मुरलीधर रामकृष्ण पडवळ, विक्रम मुरलीधर पडवळ आणि अलका विक्रम पडवळ (सर्व रा. कर्जुलेपठार) यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीसह खुनाचा प्रयत्न, खून आदींसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन ही आरोपींना पोलिसांनी अटक करुन न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपाधिक्षक डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे.