मुंबई | Mumbai
मुंबई महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष युतीमध्ये निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतरची ही पहिली महापालिका निवडणूक आहे. यामध्ये शिंदे गटाला भाजपपेक्षा कमी जागा देण्यात आल्या आहेत. तर भाजपच्या उमेदवार यादीमध्ये परप्रांतियांचा भरणा आहे. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
भाजप हा मराठी माणसांचा पक्षच नाही आहे. मराठी अस्मितेचा आणि मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा भाजपशी काडीचाही संबंध नाही, असे म्हणत संजय राऊतांनी आज भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. २०१७ साली भाजपची जी भूमिका होती, ती झुगारून आम्ही स्वतंत्रपणे लढलो होतो. याला स्वाभिमान म्हणतात, असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
आम्ही ताकदीने लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवला. आता त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणवून घेणे बंद केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेनाच खरी आहे. भाजपा हा मराठी माणसाचा पक्ष नाही. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा काडीमात्र संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या उमदेवार यादीमध्ये परप्रांतियांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असा घणाघात देखील संजय राऊत यांनी केला आहे.
हे ही वाचा: Malegaon Elections : मालेगावात महायुती फिस्कटली; भाजपचा ‘एकला चलो रे’ चा नारा
स्टार प्रचारकांच्या यादीत परप्रांतिय
भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत सर्वाधिक भरणा हा परप्रांतियांचा आहे. सोमवारी भाजपची ६६ उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली, यामध्ये २० अमराठी उमेदवारांना तिकीट देण्यात आले. रात्रीतूनच त्यांच्याकडे एबी फॉर्म पोहोच करण्यात आले. या उमेदवारांमध्ये जिग्ना शाह, जितेंद्र पटेल, राणी त्रिवेदी, शिवकुमार झा, मनीषा यादव, स्वाती जैस्वाल, सिद्धार्थ शर्मा, संदीप पटेल, विनोद मिश्रा, तेजिंदरसिंह तिवान, रोहन राठोड, सुधा सिंह, अनिश मकवाना, ममता यादव, हेतल गाला, नील सोमय्या, चंदन शर्मा, साक्षी कनोजिया, आकाश पुरोहित, रवी राजा यांचा समावेश आहे.
भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार असल्याची चर्चा आहे, यावर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, मुंबईत पंतप्रधान मोदींनी प्रचाराला येण्याचे कारण काय आहे? योगी आदित्यनाथ येथे येऊन काय करणार आहेत? भाजपला त्यांच्या येथील नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही का, असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला. भाजपने कोणालाही प्रचाराला आणले तरी मुंबई ठाकरे बंधूंच जिंकणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.





