मुंबई | Mumbai
अवघा महाराष्ट्र हादरवून सोडलेल्या बदलापूर शाळेतील चिमुरडींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक करण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून प्रहार केला आहे. भाजपच्या या कृत्यावर शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची खरडपट्टी काढली. तुषार आपटेची नियुक्ती हा भाजपचा राजकीय व्यभिचार असल्याची टीका करत ते म्हणाले की, लाडक्या बहिणींना १५०० रुपये देऊन तुम्ही त्यांची अब्रू विकत घेत आहे का? असा संतप्त सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला भाजपने इनाम दिले आहे का? अशा शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. राऊत म्हणाले की, बदलापूरच्या शाळेत जेव्हा हे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण घडले, तेव्हा शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार घेऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दबाव आणला होता. ते म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांना १५०० रुपये देत आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा ‘व्यभिचारी’ प्रवृत्तीच्या लोकांना सन्मानाने पक्षात घेऊन महानगरपालिकेत पाठवत आहे.
‘बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्राज सिटी’; अण्णामलाईंच्या वक्तव्याने भाजप अडचणीत, संजय राऊतांची सडकून टीका
फडणवीस त्यालाही क्लीन चिट देतील
संजय राऊत यांनी सांगितले की, ज्या शाळेच्या आवारात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, त्या शाळेच्या संचालकांवर जबाबदारी नाही का? हे आपटे नावाचे गृहस्थ आरएसएस आणि भाजपकडचे आहेत, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपने ‘इनाम’ दिले आहे का? आरोपी अद्याप न्यायालयातून निर्दोष सुटलेले नाहीत आणि खटला अजून प्रलंबित आहे. भाजपकडून हा खटला चालू दिला जात नाही आणि भविष्यात फडणवीस त्यालाही ‘क्लीन चिट’ देतील, अशा शब्दात राऊतांनी टीका केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, अलिकडच्या काळातील काही घटना तुम्ही पाहिल्या तर महिलांवरील अत्याचार, अन्यायाच्या घटनांमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधीत लोक बरबटलेले आहेत. त्यांना पक्षात महत्त्वाच्या पदांवर घेणे हेच भाजपचे राष्ट्रीय धोरण राहिलेले आहे. बदलापूर येथली शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण दोन दिवस पेटले होते. ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. यामध्ये मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. ज्या शाळेमध्ये अत्याचार झाला त्यांच्याविरोधात पीडित मुली आणि त्यांच्या आईची तक्रार देखील घेतली गेली नव्हती.
म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकण्यासारखे आहे
राऊत यांनी सांगितले की, अत्याचार प्रकरणातील आरोपीला थेट स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकण्यासारखे आहे. हे कृत्य अत्यंत घृणास्पद, लज्जास्पद आणि राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे आहे, असे राऊत म्हणाले. फडणवीस जेव्हा म्हणतात की त्यांचे इतर पक्षांशी वैचारिक मतभेद आहेत, तेव्हा “लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी तुमची युती होऊ शकते का?” असा सवाल त्यांनी विचारला.
आम्हाला वाटलं ते जेलमध्ये आहे
खासदार राऊत म्हणाले की, बदलापूरच्या ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेच्या संचालकांची काही जबाबदारी नाही का? उलट ते या घटनेनंतर फरार झाले. नंतर सरेंडर झाले. आम्हाला वाटलं ते जेलमध्ये आहेत. पण आता कळलं की ते नगरपालिकेच्या सभागृहात आहे. रवींद्र चव्हाण त्यांना घोड्यावर बसवून घेऊन चाललेत, असा टोला त्यांनी लगावला.
संजय राऊत म्हणाले की, आपटे नावाचे जे गृहस्थ आहेत, ते भाजप आणि संघाशी संबंधीत आहेत. त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपने बक्षीस दिले आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पूर्वी इनाम देण्याची पद्धत होती. ते निर्दोष सुटलेत का? त्यांच्यावर खटला चालून ते निर्दोष सुटले असते तर आम्ही काही बोललो नसतो. पण अजून खटला सुरु आहे. भविष्यात तो खटलाही चालू दिला जाणार नाही आणि मुख्यमंत्री फडणवीस त्यांना क्लीन चीट देतील, असेही राऊत म्हणाले.




