Tuesday, February 3, 2026
HomeराजकीयSanjay Raut : "देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदे यांनी…"; हिंदी भाषा सक्तीवरून...

Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदे यांनी…”; हिंदी भाषा सक्तीवरून संजय राऊतांचं ओपन चॅलेंज

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तृतीय भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘त्रिभाषा सूत्रा’बाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी साहित्यिक, भाषातज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतर संबंधितांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या मुद्यावर शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर तीव्र हल्ला चढवला असून, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह साहित्यिक व कलाकारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

सोमवारी रात्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांनी सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत केल्यानंतर देशातील इतर राज्यांतील परिस्थिती जनतेसमोर मांडली जाईल, असे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना राऊतांनी सरकारच्या कार्यप्रणालीवरच प्रश्न उपस्थित केला. “मराठी भाषेच्या मुद्यावर साहित्यिकांशी चर्चेची गरजच काय? किती साहित्यिकांनी आतापर्यंत छाती ठोकून मराठीसाठी आवाज उठवला? फडणवीसांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का? एकनाथ शिंदेंना तरी पाच जणांची नावं माहिती आहेत का?”, असा थेट सवाल राऊतांनी केला.

YouTube video player

राऊतांनी साहित्यिकांनाही यावेळी सुनावले. “जर खरंच साहित्यिकांना मराठी भाषेची चिंता असेल, तर हिंदी लादण्याच्या या मोहिमेविरोधात त्यांनी का गप्पा मारल्या? मराठी भाषेवर अन्याय होत असताना त्यांचा आवाज का ऐकू येत नाही?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच त्यांनी काही मराठी कलाकारांनाही लक्ष्य केले. “नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित कुठे आहेत? मराठी क्रिकेटपटू कुठे गेले? मराठी माणसाने तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचवलं, पण आता मराठी भाषेच्या संकटात तुम्ही का शांत आहात?”, असा आक्रमक सवाल राऊतांनी केला.

राऊतांनी साहित्यिक आणि कलाकारांवरील टीकेसोबतच सरकारच्या दृष्टिकोनावरही बोट ठेवले. “फडणवीस यांनी हे लक्षात घ्यावं की ९० टक्के पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि लाभार्थी सरकारसमोर लाचार आहेत. त्यामुळे ते काही बोलणारच नाहीत,” असा घणाघात त्यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक उदाहरणाचा दाखला देत म्हटले, “माझ्या मुलींनी मराठी शाळेत शिक्षण घेतलं, याचा मला अभिमान आहे. आम्ही हट्टाने त्यांना मराठी शाळेत टाकलं. पण तुमची मुलं कुठे शिकतात? कोणत्या भाषेत शिक्षण घेतात?”, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

राऊतांनी भाजपमधील मंत्र्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “महायुतीतील नेते, मंत्री, साहित्यिक यांची मुलं आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये शिकतात. मग तुम्ही मराठी भाषेसाठी कोणाशी चर्चा करणार? हे ढोंग आता थांबवायला हवं,” असे त्यांनी ठणकावले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हा वाद सध्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात चर्चेचा विषय ठरला आहे. हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, येत्या काही दिवसांत सरकार काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साहित्यिक, कलाकार आणि जनता यांच्याकडूनही या मुद्यावर स्पष्ट भूमिका अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणात मराठी भाषेचे स्थान आणि भवितव्य याबाबत सविस्तर चर्चा होणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्या

प्रफुल्ल

Praful Patel: राष्ट्रीय नेता निवडीपासून ते पक्षाचे विलिनीकरण, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच...

0
मुंबई | Mumbaiमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्त्वाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा...