मुंबई | Mumbai
आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ फेरीतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये पार पडला. दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला. मात्र, या सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू साहिबजादा फरहानने दमदार अर्धशतक झळकावल्यानंतर केलेल्या सेलीब्रेशनमुळे वाद सुरू झाला आहे. या घटनेवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
भाजपचे अंधभक्त भारतीय खेळाडूंनी कशाप्रकारे पाकिस्तानशी शेकहँड केला नाही, हे कौतुकाने सांगत आहेत. मात्र, काल साहिबझादा फरहान याने मैदानात जो प्रकार केला त्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने त्याच्या कंबरड्यात लाथ मारायला हवी होती, असे संतप्त उद्गार संजय राऊत यांनी काढले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
काल भारत-पाक सामना खेळला गेला. साहिबझादा फरहान या खेळाडूने त्याचं अर्धशतक झाल्यावर मैदानातच एके-47 हातात धडाधड गोळ्या झाडतात तशी अॅक्शन केली. त्याने दाखवले की, आमच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये तुमच्या २६ नागरिकांना अशाप्रकारे गोळ्या घालून ठार मारले. त्याने भारताला डिवचले, शहीदांचा अपमान केला. मात्र, भाजपच्या अंधभक्तांना भारत आणि पाकच्या खेळाडुंची शाब्दिक चकमक आणि सूर्यकुमार यादवने कशाप्रकारे शेकहँड केला नाही, याचेच कौतुक आहे. हे इतरांनी केले असते तर भाजपने रस्त्यावर उतरुन थयथयाट केला असता. पण आता भाजपचे नेतेही पाकिस्तानविरुद्ध बोलायला घाबरत आहेत, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली.
आजच्या भारत पाकिस्तान सामन्यात हे घडले, साहिबजादा फरहान याचे अर्ध शतक होताच त्याने मैदानात AK 47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची एक्शन केली. पाकड्यानी निरपराध भारतीय पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता. बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे. भारताचे लष्कर आणि पुलवामा पहेलगाममध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे, अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह महान आहेत!”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
काल पंतप्रधान मोदी यांनी पाच वाजता देशाला संबोधित केले. एरवी मोदींची धक्का द्यायची वेळ रात्री आठ वाजताची आहे. मात्र, भाजपच्या अंधभक्तांना भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना पाहता यावा, त्यासाठी मोदी काल पाच वाजता बोलले. जय शहा काल बीसीसीआयच्या निवडणुकीमुळे मुंबईत होते. काल पाकिस्तानी खेळाडू मैदानात बंदुकीसारखी बॅट उंचावून दाखवत होता. अमित शाह आणि जय शाह यांच्यामुळे हे सगळे देशाला भोगावे लागत आहे. या कार्यासाठी जय शाह यांना भारतरत्न दिला पाहिजे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निरपराध लोकांची हत्या केली. भारतीय महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. मग तरीही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचे प्रयोजन काय? कोण हा जुगार खेळतेय? भारत पाकिस्तान सामन्यावर दीड लाख कोटी रुपयांचा सट्टा खेळण्यात आला, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




