छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत ११० कोटी रुपये असताना, ते केवळ ६७ कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावर संजय शिरसाट यांनी राऊत यांना मूर्ख माणूस म्हणत विट्स हॉटेलचा लिलाव न्यायालयाच्या आदेशाने झाला” असे स्पष्टीकरण दिले होते. त्यातच आज पुन्हा एकदा याच मुद्द्यावरुन संजय राऊत विरुद्ध संजय शिरसाट आमने-सामने आले आहेत.
संजय शिरसाट म्हणाले की, गेल्या १० दिवसापासून एक विषय चर्चेला येत आहे. माझ्या मुलाने संभाजीनगरमध्ये एक हॉटेल विकत घेतले आहे. त्या हॅाटेलचे प्रकरण कोर्टात गेले आहे. गेली अनेक वर्ष भागंदाराचा व्यवहार रखडलेला आहे. सात वेळा लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे. त्यावेळी कोणी हॉटेल घेतले नाही. आठव्या वेळी माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्राने टेंडर भरले. त्यासाठी आवश्यक रक्कम देखील भरण्यात आली. आता हे केल्यानंतर मूर्खासारखे काही जण स्टेटमेंट करू लागले. मुळात ज्यावेळी व्यवहार पूर्ण होईल त्यानंतर बोलायला पाहिजे होते ना. मुळात ज्यावेळी हॉटेल खरेदी होईल, त्यावेळी सगळा व्यवहार हा व्हाइटमध्ये दिसेल ना. ११० कोटी रक्कम त्यांनी कुठून आणली? ६८ कोटी रुपयांचा रुपयांचा विषय आहे. आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्या, असे त्यांनी म्हटले.
संजय शिरसाट यांनी यावेळी संजय राऊत यांनी सांगितलेल्या ११० कोटींच्या किंमतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्ही आठव्या वेळेला टेंडर घेतले, मराठी माणसाच्या हक्काचे बोलणाऱ्यांना काय पोटशूळ उठले आहे? प्रोसेस पूर्ण तर होऊ द्या. मी आज निर्णय घेतला आहे. ११० कोटी आहेत ना? संजय राऊतला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. तुमची लायकी नसल्यामुळे तुम्हाला लोन मिळत नाही. मी कुणाच्या घरात लोन मागायला गेलो नाही, लोन देणारे माझ्या दारात येतात. मी माझ्या मुलाला सांगणार आहे, टेंडरमधून बाहेर व्हा. दम असेल तर तुम्ही टेंडर भरा आणि हॉटेल घ्या”, असे ओपन चॅलेंज संजय शिरसाट यांनी दिले आहे.
उद्या माझा मुलगा या टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडतोय. व्यवसायासाठी उभ्या राहणाऱ्या व्यक्तीच्या कामात संजय राऊत तुम्ही खोडा घातला आहे. मराठी माणूस उभा राहत होता. मात्र, तुम्ही ते होऊ दिले नाही. तुम्ही वैयक्तिक जात असाल तर मला सुद्धा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जावे लागेल. कारण, तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मी सुद्धा सगळ्या गोष्टी काढेन. संजय राऊत लक्षात ठेवा, मी थोडा चक्रम माणूस आहे. घराला आग लावायला कमी करणार नाही. संजय राऊतला ब्रिफिंग कुणी केले ते चुकीच केले आहे. केवळ संजय शिरसाट नाव येत आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी बोंब मारायला सुरुवात केली आहे, अशी टीका देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय शिरसाट यांच्या या टीकेला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले. “मी आरोप केला नव्हता. मी काही प्रश्न विचारले होते. आरोप कशाकरता करायचे? खरे म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला हवे या मताचे आम्ही आहोत. शिवसेनेची स्थापना यासाठीच झाली आहे. आपली मराठी मुले, मराठी तरुण यांनी नोकऱ्या न करता ते नोकऱ्या देणारे व्हावेत. त्यांनी उद्योग करावेत. फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून, अशाप्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्राची लूट करू नका, अशी आमची भूमिका आहे.” असे संजय राऊत म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा