तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे हरिनामाचा जयघोष करीत निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळा सोमवारी (दि.16) दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक (ता. संगमनेर) येथील आश्वीनाथ गड डोंगर परिसरात दाखल होताच लेझीम पथक, फटाक्यांची आतिषबाजी आणि जेसीबीतून फुलांच्या वर्षावात अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्यात हजारोंच्या संख्येने भाविक वारकरी सहभागी झाले आहेत. पारेगाव बुद्रुक येथील आश्वीनाथ गड डोंगर परिसरात दिंडी व पालखी सोहळा दाखल होताच हरिनामाचा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात पदाधिकारी व ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करीत पालखीचे दर्शन घेतले. आमदार अमोल खताळ, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लंगोरे, प्रांताधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ अरगडे, अॅड. त्रिंबक गडाख, साहेबराव गडाख, सरपंच संध्या गडाख, सोपान एलके, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, अमोल दिघे, बाबा गडाख, गणेश गडाख, लक्ष्मण गडाख, दौलत गडाख यांसह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यंदा प्रथमच दिंडीतील भाविकांसाठी तीन वॉटरफ्रूफ मंडपाची उभारणी करण्यात आली असून यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे महायुती सरकारने मंडपासाठी पाच लाख रूपये, ग्रामपंचायतीसं दिंडीला सुविधा देण्यातकरीता 2 लाख रुपये अनुदान तसेच 250 शौचालय आणि स्नानगृहा करीता 200 यूनिट उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याने भाविकांची चांगली सोय झाली, असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्यावतीने वारकर्यांची सर्व सुविधा करण्यात आली आहे.
यानिमित्ताने हजारो वारकरी खांद्यावर भगव्या पताका घेत, हरिनामाचा गजर करत, टाळ-मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात दिंडीत तल्लीन झाले.
दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आश्वीनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, पारंपरिक वाद्य व वेशभूषा करून पालखीचे स्वागत केले. यावेळी सर्वत्र हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडी व पालखी सोहळा येथे मुक्कामी असणार आहे. ग्रामस्थांचे आदरतिथ्य स्वीकारून मंगळवारी सकाळी दिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.
जिल्ह्यात प्रवेश करताना दरवर्षी माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहून पालखीचे स्वागत करतात. ते दिल्लीत असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून वारकरी व गावकर्यांशी संवाद साधला. तसेच वारकर्यांसाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका, अमृत उद्योग समूहातील संस्थांच्या माध्यमातून राहण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याचा टँकर, दवाखाना, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देताना संगमनेर तालुक्यातून दिंडी जाऊपर्यंत सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना यशोधन व अमृत उद्योग समूहाला त्यांनी दिल्या आहे.




