अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सरपंचपदाचे फेरआरक्षण प्रक्रिया राबविला जात आहे. जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणार्या 1 हजार 223 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण आज बुधवार 23 आणि उद्या गुरूवार 24 जुलै रोजी काढले जाणार आहेत. परंतु तीन महिन्यांपूर्वी काढलेले आरक्षण कायम राहणार असून महिला आरक्षणात फेरबदल होण्याची शक्यता आहे.
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार 23 आणि उद्या गुरूवार 24 जुलै रोजी दुपारी 12 वाजता एसटी, एससी आणि ओबीसी वर्गाचे सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार आहे. यानंतर उपविभागीय अधिकारी दुपारी एक वाजता महिला सरपंचपदाचे आरक्षण काढणार आहेत. जिल्ह्यातील 96 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या आरक्षणानुसार झालेल्या नाहीत. यामुळे तेआरक्षण कायम ठेवून उर्वरित ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार आहे.
दोन दिवस चालणार प्रक्रिया
– 23 जुलै रोजी अकोले, जामखेड, श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगाव, पारनेर, अहिल्यानगर या सात तालुक्यांतील सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
– 24 जुलै रोजी संगमनेर, कर्जत, राहुरी, राहाता, पाथर्डी, श्रीगोंदा, नेवासा या सात तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण काढले जाणार आहे.




