नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सौदी अरेबियात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व भारतीय उमराह करण्यासाठी सौदीला गेले होते. सोमवारी सकाळी हे भारतीय बसमधून मक्का येथून मदीना येथे चाललेले. त्याचवेळी बसची डिझेल टँकर बरोबर धडक झाली. प्राथमिक रिपोर्टनुसार हा अपघात IST वेळेनुसार जवळपास १:३० च्या सुमारास मुफरिहात जवळ झाला. या अपघातात ४० हून अधिक भारतीय मृत्यूमुखी पडले आहे.
माहितीनुसार, मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते. अपघातावेळी बसमध्ये कमीत कमी २० महिला आणि ११ मुले प्रवास करत होती. मक्का येथे आपली धार्मिक यात्रा करत ते मदीनाला जात होते. अपघात घडला त्यावेळेस सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. सध्या अपघातस्थळी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.
ओवैसींनी राजदूत कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला
दरम्यान, या घटनेनंतर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी सांगितले की, मलाही आत्ताच या अपघाताची माहिती मिळाली. हैदराबाद येथील २ ट्रॅव्हल एजन्सी लोकांना घेऊन मक्का मदिना येथे गेले होते. तिथे अपघातात बसला भीषण आग लागली. त्यात १ वगळता इतर कुणीही वाचले नाही असे कळतेय. मी तिथल्या राजदूत कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते देखील अपघाताची माहिती घेत आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनी तात्काळ या घटनेची दखल घ्यावी. या घटनेतील प्रवाशांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणले जावेत. जखमींना योग्य ते उपचार मिळावेत अशी माझी भारत सरकारकडे मागणी आहे असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून शोक व्यक्त
या अपघातानंतर हैदराबादमधील कुटुंबांना धक्का बसला असून, तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शोक व्यक्त केला. ते MEA आणि रियाधमधील भारतीय दूतावासाशी समन्वय साधत आहेत. हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले असून, जखमींसाठी योग्य उपचाराची व्यवस्था होत आहे. सौदी सरकारनेही राहत्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे.




