मुंबई | Mumbai
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल परब यांनी राज्याचे गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी वाळू चोरीचा आरोप केला होता. यानंतर आता त्यांनी योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवलीतील सावली डान्सबार सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच अनिल परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केल्यानंतर पोलिसांनी या बारवर धाड टाकून २२ बारबाला ताब्यात घेतल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. “डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?” असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय.
अंतिम आठवडा प्रस्तावावर अनिल परब यांनी विधानसभेत योगेश कदम यांच्यावर हा आरोप केला. अनिल परब म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली,त्यावेळी २२ बारबाला पकडल्या गेल्या. २२ बारबाला २२ कस्टमर आणि ४ कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असे त्यांनी म्हटले.
अनिल परब म्हणाले की, एकीकडे तुम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद मिळत आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्सबारमध्ये नाचवत आहात. त्यामुळे माझी मागणी आहे की, आजच्या आज गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अजित पवार तुम्ही योग्य ती कारवाई कराल. पण आज जे मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळत आहेत, त्यांनी गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कारवाई नाही झाली तर सरकारचा पाठींबा आहे, हे सिद्ध होईल. कारण सध्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जातं आहे. आज बिहारमध्ये म्हणत आहेत की, तुमचा महाराष्ट्र बिहार झाला आहे का? जर गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे तुडवले जात असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित होतो, असे म्हणत अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





