Saturday, July 27, 2024
Homeनगरपाचवीचा निकाल वाढला, आठवीचा घसरला

पाचवीचा निकाल वाढला, आठवीचा घसरला

शिष्यवृत्तीचा अंतरिम निकाल : 3 हजार 449 विद्यार्थी पात्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

राज्य परीक्षा परिषदेमार्फत 18 फेब्रुवारीला घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. आठवी) परीक्षेचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर झाला. यात मागील वर्षीच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या निकालात वाढ होऊन 30 टक्के निकाल लागला आहे. तर दुसरीकडे पाचवीचा निकाल मात्र घसरला असून 9 टक्क्यांवर आला आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 2024 वर्षातील पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारीला घेण्यात आली. नुकताच त्याचा अंतरिम (तात्पुरता) निकाल राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असेल ती झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, मागील वर्षी पाचवीच्या शिष्यवृत्तीचा निकाल 27.19 टक्के लागला होता. यात यंदा 3 टक्के वाढ होऊन तो 30.17 टक्के लागला. याशिवाय आठवी शिष्यवृत्तीचा मागील वर्षीचा निकाल 13.25 टक्के लागला होता.

तो 4 टक्के घसरून 9.11 टक्क्यांवर आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी वर्षभर शिष्यवृत्तीचा निकाल वाढण्याच्या अनुषंगाने विविध सराव चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. त्याला काही प्रमाणात यश आल्याने पाचवीचा निकाल वाढला. मात्र आठवीचा निकाल घसरला. आता पुढील वर्षी आठवीचा निकाल सुधारण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.

पाचवीच्या 134 शाळांचा शून्य टक्के निकाल
पाचवीसाठी जिल्हा परिषदेच्या 11 हजार 99 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिला. यातून 3 हजार 349 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. यात 134 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला, तर 31 शाळांचा निकाल 100 टक्के लागला. यात 300 पैकी 262 ते 280 गुण असणारे 5, तर 282 ते 300 दरम्यान गुण असणारा एक विद्यार्थी आहे.

आठवीचे 100 विद्यार्थी पात्र
आठवीच्या परीक्षेसाठी 1 हजार 98 विद्यार्थी उपस्थित होते. त्यातील 100 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर 28 शाळांचा निकाल शून्य टक्के लागला. 100 टक्के निकाल लागणार्‍या 2 शाळांचा समावेश आहे. यात 300 पैकी 180 ते 210 गुण असणारे 17 विद्यार्थी आहेत, तर 212 च्या पुढे गुण एकाही विद्यार्थ्याला मिळाले नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या