मुंबई | Mumbai
राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, असे दावे फेटाळत शरद पवार आणि भाजप एकत्र येणे शक्य नाही, असे ठाम मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
मराठा विरुद्ध इतर समाज एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. छगन भुजबळ यांना लोकहितापेक्षा राजकारण जास्त महत्त्वाचं वाटते” अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. “फडणीसांनी म्हटले आहे जो ओबीसी के साथ रहेगा वही राज करेगा. माझ्याविरुद्ध ओबीसींना आक्रमक केले जाणार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी ही आग लावण्याच काम सुरू झाल आहे. मराठा खतरे में है, ओबीसी खतरे में है, धनगर खतर में हें, असे सांगून पुन्हा वाद पेटवला जाईल” असेही बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांच्या मुद्यावर म्हणाले की, “अजितदादाच अर्थमंत्री आहे. राज्याच्या तिजोरीची चावी त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे निधी मिळत नाही हे नाराजीचे कारण असू शकत नाही. अजित पवार यांच्या नाराजीच वेगळे काही कारण असू शकते” असे बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, प्रत्येक पक्षाची आपली राजकीय खेळी वेगवेगळी असते. प्रत्येक पक्षाने ठरवायचे आहे की खेळी किती बेईमानीने खेळायची किंवा सात्विक पणाने खेळायची. राजू शेट्टींच्या आंदोलनासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढावा. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे. वेळ पडल्यास राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होईन, अशी ग्वाही बच्चू कडू यांनी दिली.