बारामती | Baramati
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाही तर राज्यातही घडामोडींना वेग आला आहे. काल शुक्रवारी अनेक घडामोडी घडत घडल्या. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे वर्षावर पोहचले होते. त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सव्वातास बैठक झाली. आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. दरम्यान आज सकाळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण याबाबत सविस्तर भाष्य केले. अजित पवार पक्षाची जबाबदारी सांभाळत होते. ते गेले, आता कुणीतरी पुढे यायला हवे. त्यातून पक्षाने निर्णय घेतलेला दिसत आहे, असे शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर बोलताना सांगितले.
Sharad Pawar: “तो त्यांच्या पक्षाचा…”; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य
एवढी घाई कशासाठी सुरू आहे, कोण करत आहे हे सगळे, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर मी नाही, मला एवढे माहिती आहे की, आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. अजित पवार आणि जयंत पाटील दोघेही यावर चर्चा करत होते. हा निर्णय अंतिम टप्प्यात आला होता. विलिनीकरणाची तारीख देखील ठरली होती. १२ तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता. पण दुर्दैवाने हा अपघात झाला. मला बाकी माहिती नाही. मला कोण सांगणार, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही अजितदादांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असे मोठे वक्तव्य देखील शरद पवारांनी केले आहे. या वक्तव्यातून त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याला थेट ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र विलीनीकरणासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटातील मोठे नेते उत्सुक नाहीयेत. त्यामुळेच त्यांनी घाईघाईत सुनेत्रा पवारांच्या हाती उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे दिल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.




