मुंबई | Mumbai
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यातील वातावरण पेटलं असून त्याचे सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. पडळकरांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून याची गंभीर दखल घेतली गेली आहे. पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन ‘बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा’ असे म्हटले आहे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध ही व्यक्त केला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट फोन केला. त्यांच्या आमदारांनी केलेल्या कृतीचा शरद पवारांनी निषेध व्यक्त केला. ज्या खालच्या थराला जाऊन टीका होत आहे, ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली. अशा वाचाळवीरांना, खालच्या पद्धतीने टीका करणाऱ्यांना आवरा असेही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.
गोपिचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते?
गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना, जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, अशी पातळी सोडून टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
जयंत पाटलांनी मला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. याने महाराष्ट्र कसा चालवला, जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही. जयंत पाटलाचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करण्याचं आहे. पण मी काय आता आलोय का? असे अनेक अंगावर घेऊन आलोय.
या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन-दोन महिने मी जेलमध्ये जाऊन आलोय. जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली. गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली. जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिलं. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, असे वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकर यांनी केले होते. दरम्यान, आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भुमिका घेता याकडे सर्वांचे लक्ष आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




