मुंबई | Mumbai
सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत ‘वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.’ असा आरोप केला होता. त्यावर आता स्वतः शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
अग्रलेखाला आमच्या लेखी काही महत्त्व नाही, आम्ही पक्षात काय करतो हे संजय राऊत यांना माहिती नाही. आम्ही आमचं काम करत आहोत त्यांना काहीही लिहू देत. राष्ट्रवादीने अनेकांना कॅबिनेट मंत्री करून संधी दिली. त्यामुळे आमच्यावर कोणही टीका केली तर आम्ही दुर्लक्ष करतो, अशा शब्दात शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही टोला हाणला. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पक्षात काय परिस्थिती आहे, हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचारले तर ते खासगीत सांगतो असे म्हणतील, असे पवार म्हणाले.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलं होतं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत.
त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच.
पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला.