नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत या हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवली आहे. या शिष्टमंडळांच्या माध्यमातून भारताचे प्रतिनिधी बनून गेलेले नेते विविध देशात भारताची भूमिका स्पष्ट करत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेल्या शशी थरूर यांनी मोठे विधान केले आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी बुधवारी पाकिस्तानला कडक इशारा देत म्हटले की, भविष्यात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना भारत जोरदार प्रत्युत्तर देईल. महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करताना, थरूर म्हणाले की, आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले आहेत. ‘इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश आता दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,” असे थरूर यांनी पनामा येथील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.
पनामा येथे भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शशी थरूर यांनी दहशतवादाविरोधातील भारताचा दृढ निश्चय अधोरेखित केला, ते म्हणाले की, आपण आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी नेहमी उभे राहिले पाहिजे, असे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आपल्या साहसी नेतृत्वाद्वारे आम्हाला शिकवले होते. आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो. त्या मूल्यांच्या संरक्षणासाठी आपण उभे राहिले पाहिजे.
भारतात आपल्याला आज दहशतवाद्यांच्या भीतीशी लढावे लागत आहे, ज्या लोकांना जग दहशतवादी म्हणते, त्यांना असे वाटते की, ते आपल्या देशात येऊन, निष्पाप लोकांना मारून आपण काही मोठे राजकीय किंवा धार्मिक उद्दिष्ट साध्य करत आहेत.” “कोणताही स्वाभिमानी देश अशा गोष्टींना बळी पडणार नाही आणि जेव्हा असे होईल तेव्हा महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ,” असे थरूर पुढे म्हणाले. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावरही शशी थरूर यांनी टीका केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा