धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे कृषी धोरणा विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत सुमारे एक लाखांपेक्षा जास्त शेतकर्यांनी सहभाग घेतला.केंद्रातील मोदी सरकारने पारीत केलेल्या कृषी विधेयकामुळे शेती व्यवसायाचा आत्मा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या जर नष्ट झाल्या तर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव व बाजारभाव देखील मिळणार नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उदरनिर्वाह भागविणारे मजूर,हमाल हे घटक बेरोजगार होतील तसेच आडत व्यवसाय देखील पूर्णपणे उध्दवस्त होईल.
शेती बाजारपेठ मोडीत निघाल्यामुळे राज्याच्या महसुलात घट होईल परिणामी ग्रामीण शेती विकासावर त्याचा विपरीत परीणाम होईल.
करार शेती पध्दतीने शेतकार्यांची फसवणूक होवून शेतात मजूर म्हणून राबावे लागेल.जमीन कसणारा,बटाईने शेती करणारा व शेतात मजूरी करणार्यांना या विधेयकात कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही.
अशा स्वरूपाच्या कायद्याच्या विरोधात आज जिल्ह्याचे प्रभारी विनायकराव देशमुख,आ.कुणाल पाटील व अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
यावेळी शेतकरी, शेतमजूर, हमालमापाडी, मजूर यांनी या मोहिमेत भाग घेवून स्वाक्षरी केली. सुमारे एक लाखापेक्षा जास्त स्वाक्षर्या झाल्या.