अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होवू घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि शनिशिंगणापूर या प्रमुख धार्मिक स्थळांवर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर इतर संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले. डॉ. आशिया म्हणाले की, उत्तर प्रदेशात कुंभमेळ्याच्या निमित्ताने धार्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. त्याच धर्तीवर नाशिकसह जिल्ह्यातील शिर्डी व शनिशिंगणापूर येथे पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. रेल्वे, रस्ते, विमानतळ इत्यादी वाहतूक सुविधांच्या उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावेत.
शिर्डीमध्ये पर्यायी रस्ते, बाह्यवळण मार्ग, बायपास रस्ता आणि परिक्रमा मार्गाच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, वाहतूक सुरळीत राहण्यासाठी योजनाबध्द प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शनिशिंगणापूरकडे जाणार्या रस्त्याचे रूंदीकरण, पार्किंग व्यवस्था, पाणी, विद्युत, वैद्यकीय सेवा, हेलिपॅड, गावांतर्गत रस्ते व स्ट्रीटलाईट उभारणीसाठी आवश्यक निधीच्या प्रस्तावावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक साहित्याचीही पूर्तता करण्यास सांगितले असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व पातळ्यांवर तयारी करण्याचा जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी पुनरूच्चार केला.