शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
निमगाव ग्रामपंचायत हद्दीतील 11 नंबर चारीवरील शासकीय जागेवरील 300 अनधिकृत घरे हटवण्याची कारवाई प्रशासनाने केली. या जागेवर अनेक वर्षांपासून असणारी घरे प्रशासनाने जमीनदोस्त केली. प्रशासनाने आमचे आधी पुनर्वसन करून नंतर या ठिकाणचे अतिक्रमण काढायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया यावेळी अतिक्रमणधारकांनी बोलून दाखवली. सोमवारी सकाळी शिर्डी नजीकच्या निमगाव हद्दीतील चारी नं 11 वरील शासनाच्या जागेवरील जवळपास 300 कच्च्या तसेच पक्क्या घरांवर पोलीस बंदोबस्तामध्ये हातोडा पडला. या मोहिमेत सर्व घरे जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी येथील रहिवाशांनी आपला संसार उघड्यावर पडल्याने आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली.
प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना अतिक्रमणधारक म्हणाले, आम्ही 50-60 वर्षांपासून येथे राहत आहोत. पहिले आमचे पुनर्वसन करून नंतर अतिक्रमण काढायला पाहिजे होते. परंतु सोमवारी अचानक जेसीबी लावून घरे पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. आमच्या मुलांची वार्षिक परीक्षा सुरू आहे. आता ही मुलं शाळेत कशी जाणार? असा सवाल पालकांनी उपस्थित केला. सदर अतिक्रमणधारकांना कारवाई करण्यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे बहुतांशी अतिक्रमणधारकांनी आधीच आपली घरे हटवली होती. त्यामुळे फारसा विरोध झाला नाही. मात्र ज्या कुटुंबांचे घर पाडण्यात आले. त्यांना कोणतेही पर्यायी घर मिळाले नाही. आमच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. आम्ही रोजंदारीवर काम करणारे लोक आहोत. आम्ही आता कुठे जाऊ? असा आक्रोश एका महिलेने केला.
आम्हाला अर्धा गुंठा जागा दिली तरी चालेल. आम्ही स्वतःपत्र्याची शेड बांधून राहू. पाणी आणि वीज पुरवठ्याची सोय केली जावी. कालपासून आम्ही अन्नाचा कणही घेतलेला नाही. आम्ही कोठेही स्थलांतर करण्यास तयार आहोत, पण आम्हाला जागा द्या अशी मागणी अतिक्रमणधारकांनी प्रशासनाकडे केली.
या अतिक्रमण मोहिमेत जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली होती. राज्यात शासकीय जागेवर असणारे घरे तसेच दुकाने व इतर अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून या मोहिमेचा अतिक्रमण धारकांनी चांगलाच धसका घेतला आहे. ज्या ठिकाणी कारवाई झाली त्या ठिकाणी पुन्हा जर अतिक्रमण केले तर संबंधित अतिक्रमण धारकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असे प्रशासनाने सांगितले. या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले असले तरी अतिक्रमणधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नियोजित कारवाई – शहाणे
यावेळी नाशिक जनसंपदा विभागाच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती शहाणे यांनी सांगितले की, 11 नंबर चारीवरील अतिक्रमण हटवण्याची ही नियोजित कारवाई होती. जलसंपदा विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व अतिक्रमणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या भागात मंदिरे व इतर काही ठिकाणी महापुरुषांचे स्मारक आहे. त्यामुळे लोकांच्या भावना जुळलेल्या असल्यामुळे कठोर कारवाई केली नाही. लोकांना त्यांच्या धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.