शिर्डी (प्रतिनिधी)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर आणि जलप्रलयामुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत.
अशा बिकट परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी धावून आले आहे. साईबाबांच्या ‘सबका मालिक एक’ या शिकवणुकीला जागून, संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Chief Minister’s Relief Fund) १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दरवर्षी शिर्डीला देश-विदेशातून लाखो भाविक भेट देतात. या देणग्या आणि संसाधनांमधून मिळणारा निधी विविध सामाजिक व सेवाभिमुख उपक्रमांसाठी वापरला जातो. याच परंपरेतून आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक योगदान देण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.
यामुळे शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसांत मराठवाड्यासह नगर, नाशिक अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतजमिनी, पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिक बेघर झाले असून प्रशासनाच्या मदतीसोबत समाजातील विविध घटक देखील पुढे सरसावले आहेत.





