मुंबई | Mumbai
राज्यात दसरा मेळावे होत असतानाच नागपुरातील रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळा झालेला आहे. या सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदची यांची प्रमुख उपस्थिती होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील विविध विषयांसह आंतरराष्ट्रीय घटनांवर भाष्य केले. यासोबत राज्यात आज ४ दसरा मेळावे होऊ घातले आहे. मुंबईमध्ये शिवसेना पक्षाचे दोन दसरा मेळावे आहे. शिवसेना ठाकरे गटाचे शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा होणार आहे तर गोरेगाव नेस्कोसेंटरमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे. त्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यावरुन टीका केली आहे.
संजय राऊत नेमके काय म्हणाले?
स्वातंत्र्य लढामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं, हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे महान राष्ट्रकार्य संघाच्या वतीने झालं, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांना संघाशी जोडण्याच्या प्रयत्नावर राऊत म्हणाले की, “गांधी किंवा डॉ. आंबेडकर यांनी कधी संघाचं समर्थन केलं नव्हतं. संघ हा विष आहे, असे डॉ. आंबेडकर म्हणाले होते”. त्यांनी पुढे कमलाताई गवई यांना संघाच्या मेळाव्यात बोलावून संघ आणि आंबेडकरी विचारांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे काठ्या-लाठ्यांना तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही
पुढे ते म्हणाले, संघाचा दसरा मेळावा नागपूरला होतो आणि ती एक परंपरा आहे. 100 वर्ष संघाला होत आहेत. त्यांची परंपरा आहे की, ते नागपुरात संचलन करतात. त्यांच्या हातात काठ्या असतात आणि त्याच्या माध्यमातून देशाचे रक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे. पण बाळासाहेब ठाकरे दसऱ्याच्या मेळाव्यात म्हणायचे की, आम्हाला AK-47 हव्या, काठ्या-लाठ्यांना तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही. शिवसैनिकांच्या हातामध्ये AK-47 आली तर जम्मू-काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्यासाठी बलिदानाला तयार राहू, अशी त्यांची भूमिका होती, असे राऊतांनी म्हटले.
त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे, त्याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही
राऊत यांनी संघाच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले, “नक्की संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे. त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे, त्याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही. आमची पण त्यांना सहानुभूती एकेकाळी होती. पण जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात असतं, राष्ट्राविषयी कठोरपणे सत्ताधाऱ्यांविषयी भूमिका घ्यायच्या असतात, तेव्हा संघाने त्या भूमिका घेतलेल्या नाहीत”.
राऊत पुढे म्हणाले, “संघाच्या हाती आज देशाची सत्ता आहे. त्यांनी पंतप्रधान आणि इतर काही राज्यपाल नेमलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आजच्या संचलनाला सत्तेचे तेज आहे. संघाची शताब्दी झाल्यानिमित्त एक नाणे आणि पोस्टाचे तिकीट काढण्यात आले आहे. पण स्वातंत्र्य लढ्यात संघाचे नेमके काय कार्य होते? हे त्यांनी एकदा सांगितले पाहिजे.”
तर, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा प्रमुख नेत्यांचे नाव संघाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण गांधी किंवा आंबेडकर यांनी कधीही संघाचे समर्थन केले नाही. संघ हा विष आहे, असे स्वतः आंबेडकर म्हणाले होते. पण आता त्याच आंबेडकरी विचारांच्या कमलाताई गवई यांना संघाच्या आजच्या मेळाव्याला जबरदस्ती बोलवून संघ आणि आंबेडकरी विचारांचे संबंध जोडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पण मी कमलाताई गवई आणि त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन करतो की, त्या संघाच्या जाळ्यात अडकल्या नाहीत. त्या चंद्रचूड यांच्यासारख्या वागल्या नाहीत, अशी टिप्पणी करताना संजय राऊत यांनी चंद्रचूड यांना टोला लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





