अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
संघटनेत नव्या जुन्यांनी एकत्र आले पाहिजे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागापर्यंत, जनतेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. मागील वेळेपेक्षा दोन जागा आपल्याला निश्चित जास्त मिळतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त करून प्रशासक काळात सत्ताधारी विरोधकांनी कशा पद्धतीने महापालिका लुटली हे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले.
विरोधीपक्ष नेते नगर शहरात खासगी दौर्यावर होते. शहर महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी अंबादास दानवे यांची भेट घेतली. यावेळी दानवे म्हणाले, आपल्यातून अनेकजण दुसर्या पक्षात गेले. पण संघटना ही काही थांबत नाही. रेल्वे ज्या पद्धतीने असते तिच्या डब्यातून अनेक जण उतरतात, तर अनेकजण चढत ही असतात. काहीजण गेले म्हणजे नव्याने कोणी तरी येत असतं हे लक्षात ठेवावं. त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा आता नव्या जुन्याची सांगड घालून पक्ष संघटना अधिक बळकट करायची आहे. दानवे म्हणाले, आजच्या काळामध्ये जो चालेल, धावेल, त्याची ही संघटना असेल. आम्ही सुद्धा संघर्षातून संभाजीनगरमध्ये लढलो.
प्रत्येकापर्यंत पोहोचलो. त्याच पद्धतीने तुम्हीपण प्रत्येक भागात, गल्ली जा. सगळ्या ठिकाणी तुम्ही पोहोचा. जनतेमध्ये जा. जनता ही नेहमीच आपल्याबरोबर असते. यंत्रणा उभी करा. पदाधिकारी नियुक्त करा. निश्चितपणे संघटना उभी राहिल्या शिवाय राहणार नाही. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू भाले, रावजी नांगरे, विकेश गुंदेचा, जयराम आखाडे, भगवान शेंडे, दत्ता गायकवाड, दीपक काकडे, सिद्धांत भिंगारदिवे, पोपट लोंढे, भगवान शेंडे, रोहिदास भालेराव, विनोद शिरसाट, सचिन भालेराव, सचिन कापुरे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते ही शिवसेनेच्या संपर्कात
नगर जिल्ह्यातून अनेकजण इतर पक्षांमध्ये गेले. नगरसेवक असो पदाधिकारी असो. ते आज ही शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत. वारं केव्हाही, कस ही फिरत हे लक्षात असू द्या, असा टोला यावेळी त्यांनी लगावला. त्यामुळे भविष्यात गळालेले काही चेहरे परत शिवसेनेच्या गळाला लागणार काय आशा चर्चेला तोंड फुटले आहे.
स्व. अनिल भैय्यांची आजही आठवण
दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी या नगर शहरामध्ये नेतृत्व केलं. ज्या वेळेला मराठवाड्यात नामांतराच्या आंदोलनानंतर अटक झालेल्या शिवसैनिकांना विसापूरला आणले होते. त्यांना राठोड मदत केली होती. नगरमध्ये पंचवीस वर्ष त्यांनी जनतेची सेवा केली. आजही त्यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही.