मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबईत आज (१५ नोव्हेंबर) काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. काँग्रेसच्या या निर्णयावर आता शिवसेना ठाकरे पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे.
काँग्रेसच्या या निर्णयावर आता विविध पक्षातून प्रतिक्रिया येत आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या मित्रपक्षाने म्हणजेच शिवसेनेने (उबाठा) यावर प्रतिक्रिया दिली आहे. “बिहारमध्ये पक्षाचा झालेला ऱ्हास पाहूनही काँग्रेसने असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे पुढच्या काही दिवसांत सिद्ध होईल”, असे वक्तव्य शिवसेनेच्या (उबाठा) नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
नेमके काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “बिहारमधील एकंदरित झालेला ऱ्हास पाहून त्यांच्या नेत्यांनी बोध घ्यायला हवा. तो ऱ्हास पाहिल्यानंतरही त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर लढवावी. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. त्यांचे वरिष्ठ त्यांना थांबवू शकतील. जे लोक स्वबळावर निवडणूक लढवायचा निर्णय घेत आहेत त्यांना ते योग्य वाटत असेल. परंतु, पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटतेय का हा मोठा प्रश्न आहेत. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य ते पुढील काही दिवसांत कळेल.”
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले. मुंबईच्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
मुंबई काँग्रेसच्या वतीने ही निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे, हे आम्ही मांडले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्यासोबत आम्ही युती कायम राहिली आहे, त्यांच्याशीही आम्ही बोलणार आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





