मुंबई | Mumbai
नाशिक येथील मनोहर गार्डन लॉन्स येथे काल (बुधवारी) शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) एक दिवसीय विभागीय निर्धार शिबिर पार पडले. या शिबिरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. तसेच स्वर्गीय हिंदूह्द्यसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन भाषण दाखवण्यात आले. या भाषणावर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर आता विरोधकांच्या या टीकेला पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “बाळसाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असून, शिवसेनेचे निर्माते आहेत. आम्ही अमित शाहांवर केले असते तर तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवर असं काय करता असे म्हटले असते तर तुमची तक्रार योग्य आहे. अमित शाह (Amit Shah) यांनी एक बनावट संघटना केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावले म्हणून त्यांचा बाळासाहेब ठाकरेंवर अधिकार होत नाही. आम्ही बाळासाहेबांवर केले, तुमचा याच्याशी काय संबंध आहे? तंत्रज्ञान खूप पुढे गेले असून, स्वतः नरेंद्र मोदी यांनी एआय तंत्रज्ञानाबाबत देश कसा पुढे नेत आहे, याबाबत काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही आनंद दिघेंना (Aanad Dighe) ज्या बनावट पद्धतीने पडद्यावर आणलं त्यावर तुम्ही बोला, त्याच्या संदर्भात बोलला तर त्यावर वाद करू. त्यांनी आनंद दिघेंवर धर्मवीर नावावरून दोन भागांत सिनेमा काढला आहे. तो सिनेमा मी काही पाहिले नाही. या लोकांपेक्षा आनंद दिघेंना आम्ही जास्त ओळखतो. त्यांच्या नावाने बनावट भूमिका, बनावट विचार आणि बनावट संवाद हे निर्माण केलेले चाललं का? तुम्ही धर्मवीराचे आम्हाला शिकवू नका. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या जवळ राहिलो आहोत. एकमेकांच्या फार जवळ होतो”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
तसेच मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी आनंद दिघे असताना संजय राऊत हे शिवसेनेत होते तरी का? आनंद दिघे यांनी काय शिकवण दिली हे त्यांनी आम्हाला सांगू नये, असे म्हटले होते. त्यावर बोलतांना राऊत म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षातून आलेले शंभूराज देसाई आम्हाला शिकवणार का? काँग्रेस पक्षातून बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा बाळासाहेब ठाकरे शिकवणार का? इतकी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. त्यांनी इतिहास वाचावा. तो खटला काय होता आणि त्यात संजय राऊत यांची भूमिका काय होती? हे एकदा पोकळ शंभूराजेंनी समजून घ्यावे. त्यांचे पक्षप्रमुख अमित शाह यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की, फडणवीस यांची चाकरी करा नाहीतर सरकारमधून दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. फार शहाणपणा करू नका, असे प्रत्युत्तर त्यांनी देसाई यांनी दिले.