मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचा ५९ वा वर्धापन दिन मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी रणशिंग फुंकत जाहीर आव्हान दिले. यावेळ बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटावर नेहमी बोलणाऱ्या नितेश राणे यांची तर उद्धव ठाकरे यांनी इज्जतच काढली.
उध्दव ठाकरे यांनी भाजपाला आव्हान देत कम ऑन किल मी, हिंमत असेल तर अंगावर या, फक्त येताना अॅम्ब्युलन्स घेऊन या… येताना सरळ याल, पण जाताना आडवे होऊन जाल, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडला. देशाला आज पंतप्रधानाची गरज आहे, देशाला पंतप्रधान कुठे आहे? फक्त भाजपला आहे. देशाला आज गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शाहांची नाही. देशाला संरक्षणमंत्र्यांचीही गरज आहे, गुंडांना अभय देणाऱ्या राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांची नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बजावतानाच, हिंमत असेल तर गुजरातमध्ये सक्ती करून दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सातत्याने वैयक्तिक पातळीवर घसरून टीका करणाऱ्या मंत्री नितेश राणेंची चांगलीच खिल्ली उडवली. त्यांच्या बाप वक्तव्याचा सुद्धा त्यांनी ठाकरी शैलीत समाचार घेत एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा, अशा शब्दात मी त्यांना सांगत असल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या हिंदू-मुस्लिम भांडणे लावली जात आहेत. भाजपचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढेच काम दिलेले आहे. तुझी उंची किती, तुझा आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावताच एकच हशा पिकला. डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही, असे ते म्हणताच नेपाळी, नेपाळी असे आवाज आले. त्यावर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि शिवसेनेवर बोलतोस. पुढे बोलताना कोणता तरी एक बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांना बोलतोय हे त्यांना कळू द्या. शिवसेना 59 वर्षांची झाली. तरीही आमचा नेता एकच. भगवा एकच, दैवत, विचार एकच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





