Monday, September 23, 2024
Homeनगरश्रीगोंद्याच्या उमेदवारीवरून‘मविआ’ नेत्यांमध्ये खटके

श्रीगोंद्याच्या उमेदवारीवरून‘मविआ’ नेत्यांमध्ये खटके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून काही ठिकाणी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. त्यातूनच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभेचा उमेदवार जाहीर केल्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली आहे. त्यातून मविआच्या प्रमुख नेत्यांमध्ये खटके उडू लागले आहेत. त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाकडे जाते नी कोणत्या इच्छुकाची लॉटरी लागते याकडे श्रीगोंदेकरांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

श्रीगोंद्यात बोलताना शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे पुढचा आमदार ठाकरे गटाचाच राहील असे वक्तव्य चर्चेत आले होते. त्यावर शरद पवार यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली. उमेदवाराची अशी घोषणा करणे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. एका जागेवर देखील एकवाक्यता असली पाहिजे. जागावाटपानंतर पक्ष उमेदवारी ठरवेल, असेही पवारांनी स्पष्ट केले. त्यावर शरद पवारांची भूमिका योग्य असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. कुठलाही निर्णय न होता उमेदवार जाहीर करणे चुकीचे आहे. शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. कारण जेव्हा तिन्ही पक्षाचा निर्णय होईल तेव्हाच उमेदवार जाहीर केले पाहिजे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी आता शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. असे सांगत संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे.

शरद पवार यांच्याकडे श्रीगोंदाबाबत चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो. 288 मतदारसंघांत आपली तयारी आहे. कागलला सचिन घाडगे आहेत. अनेक मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश देतात तयारी करतात. श्रीगोंद्यात काय घडतं माहीत नाही. पण महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे. कुणीही कोणती तयारी केली नाही. पण आम्ही कार्यकर्त्यांना तयारीला लागा, कामाला लागा, पुढे व्हा असा संदेश दिला तर चुकीचं नाही. हेच संदेश पवार आणि नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला असेल तर त्यात चुकीचं नाही, असे म्हणाले.

काय होते राऊतांचे वक्तव्य
संजय राऊत यांची श्रीगोंद्यात सभा झाली. त्यात राऊत यांनी श्रीगोद्यांतील पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असेल, असे त्यांनी जाहीर केले होते. तर या मतदारसंघातून राहुल जगताप हे राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीतील तीन ही पक्ष मिळून उमेदवार ठरवतील. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी एकट्याने उमेदवार जाहीर करणे बरोबर नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या