Monday, June 9, 2025
Homeनगरवार्तापत्र : आतापासून श्रीगोंद्यात स्थानिक स्वराज्याचे पडघम

वार्तापत्र : आतापासून श्रीगोंद्यात स्थानिक स्वराज्याचे पडघम

काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाची नेत्यांकडे नजरा

श्रीगोंदा तालुका वार्तापत्र|शिवाजी साळुंके

- Advertisement -

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक श्रीगोंदा तालुक्याच्यादृष्टीने उत्सुकतेचा विषय आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती मोठी विचित्र झाली आहे. तालुक्यतील पहिल्या आणि दुसर्‍या फळीतील सर्वच नेते महायुतीच्या घटक पक्षात असल्याने सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समितीच्या गणात कोणती खिंड कुणी लढवायची यावर जोरदार खलबते होणार आहेत. सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि शिवसेना उबाठा गट सक्षम नेत्यांकडे आशेने पाहत असताना भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेकडे हाऊसफुलचे बोर्ड लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यात निवडणुक गाजणार असल्याची चिन्हे आहेत.

वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुती पानिपत होण्याच्या स्थितीत आलेले असतानाही राजकीय परिस्थिती अवघ्या काही दिवसांत बदलली. महायुतीच्या योजनांनी विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलले आणि राज्यात महायुतीची दमदार कमबॅक झाली. श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत देखील परंपरागत विरोधक पाचपुते, नागवडे, जगताप आमनेसामने आले. त्यात आण्णासाहेब शेलार यांनीही नशीब आजमावले. विक्रम पाचपुते आमदार झाले. नंतर मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती पाहून नागवडे, जगताप यांनी कारखाना बचाव म्हणत सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यांच्या अगोदर आण्णासाहेब शेलार आणि घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यापूर्वी नाहटा, पानसरे, भगवानराव पाचपुतेही राष्ट्रवादीमध्ये होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांची भाऊगर्दी झाली. यात दोन्ही शेलार, नागवडे, जगताप, पानसरे, नाहटा, मांडवगणचे जगताप अशी नेत्यांची गर्दी असतानाही जगताप, नागवडे यांचे समर्थक पक्षात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत भविष्यातील संधीसाठी माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि अतुल लोखंडे यांनी प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टी तालुक्यात आजही सत्ताधारी पक्षाची ऊब घेऊन आहे. अनेक कार्यकर्ते इतर पक्षांच्या तुलनेत भविष्यातील संधी ओळखून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका सदस्य होण्याची संधी ओळखून पाचपुतेच्या पुढे मागे आहेत. जर काहीच झाले नाही तर ठेकेदारी आणि एखादे काम मिळेल किंवा मिळाले आहे म्हणून भाजप आणि पाचपुते हाच आपला पक्ष मानत आहेत. मागील काही वर्षांत पाचपुतेंच्या विरोधात गेलेले कार्यकर्ते पुन्हा माऊलीवर जुळते का हे पाहत आहेत.

अशा राजकीय परिस्थितीत येणार्‍या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांच्याकडे नेते आणि कार्यकर्ते यांची भाऊगर्दी असताना निवडणुकीत कसे आमनेसामने जायचे, याचे आराखडे नेते आणि कार्यकर्ते बांधत आहेत. इकडे विरोधात काँग्रेसचे उबाठा, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेतृत्व कुणाच्या खांद्यावर जाते हे महत्त्वाचे आहे. यामुळे या तीनही आघाडी पक्षांना नवीन नेतृत्व उभे करण्याची संधी आहे. पण सत्तेची ऊब घेण्याची स्पर्धा तालुक्यात लागली असताना नवीन नेतृत्व उभे राहिले तर तो एक चमत्कार असेल.

तालुक्यात विरोधी पक्ष कोण ?
श्रीगोंदा तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांचा कौल दिसून आला. हा कौल हेरून भाजपच्या पाचपुते यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली. तालुक्यातील बड्या नेत्यामध्ये विधानसभेत राजकीय झुंज दिसली. मात्र, विधानसभेच्या निकालानंतर ही झुंज पाचपुते यांनी एकहाती जिंकल्याचे दिसून आले. त्यानंतर आता तालुक्यातील राजेंद्र नागवडे आणि माजी राहुल जगताप यांनी सत्तेत सहभागी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे तालुक्यात सर्वजण सत्तेत असल्याने विरोध कोण असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दीड वर्षांपासून सहा पंचायत समित्यांना बीडीओंची प्रतिक्षा!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीयदृष्ट्या जागृत असणार्‍या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन वर्षापासून सहा पंचायत समितीमध्ये प्रभारी राज आहे. या ठिकाणी गटविकास अधिकारी पद रिक्त...