Friday, September 20, 2024
Homeनगरबिबट्याने शेळी, कुत्रा अन् कोंबडीचा पाडला फडशा ग्रामस्थांनी भांडे वाजवून पिटाळले

बिबट्याने शेळी, कुत्रा अन् कोंबडीचा पाडला फडशा ग्रामस्थांनी भांडे वाजवून पिटाळले

खैरी निमगाव । वार्ताहर

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील खैरी गावात रवीवारी रात्री बिबट्याने दहशत माजवली. बिबट्या खैरी गावात राजेंद्र जगताप, नवले यांच्या घराजवळून शिकारीसाठी कोल्ह्याच्या मागे पळत नाऊर रस्त्यावर आलेला अनेक नागरीकांनी पाहीला.

त्यानंतर रस्त्याच्या कडेला पावसाचे साचलेले पाणी पिताना येथील गंगाराम पवार, अमोल वाघ, खंडू आढाव यांनी त्याला पाहीले आसपासच्या सर्वांना फोन करून उठवले ऐनवेळी फटाके नसल्याने भांडे वाजवून त्याला पिटाळले त्याचवेळी येथील एका कुत्र्याच्या पिल्लाला त्याने उचलले. भांड्यांचा आवाज ऐकुन बिबट्या वाघाई मंदिराच्या दिशेने गेला.

हे हि वाचा : मुळा, प्रवरा गोदावरी दुथडी; 80000 क्युसेकने पाणी जायकवाडीकडे

साधारणपणे तासाभरात पुणतांबा रस्त्याजवळ गणेश माळी यांच्या शेडमध्ये जाऊन त्याने शेळीचा फडशा पाडला. खडबड ऐकुन येथील आबासाहेब गोधडे याने झोपेतून उठून त्याला अचानक समोर पाहीले घाबरत आरडाओरड करत त्याने त्याला पिटाळले. तेथुन पुढे जात चितळी – पुणतांबा चौकातील संतोष गोरख भाकरे यांच्या शेडमधील कोंबडीला उचलले.

आवाज ऐकुन भाकरे यांनी शेडमध्ये लाईट लावले अन् दरवाजा उघडला असता निघुन जाणारा बिबट्या पुन्हा मागे वळाला यावेळी भाकरे यांना अचानक बिबट्या दिसल्याने त्यांनीही आरडाओरड करत त्याला पिटाळून लावले. शेवटी जुन्या जळगाव रस्त्याने बिबट्या गेला. सकाळच्या वेळी रमेश बनकर यांच्या मुलीने त्याला पाहीले.

हे हि वाचा : लडाखमध्ये होणार पाच नवीन जिल्हे; केंद्रीय गृहमंत्री शाहांची माहिती

दरम्यान माळी यांच्या शेळीचा फडशा पाडल्याचे समजताच वनाधिकाऱ्यांची टिम घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर येथील पशुधन अधिकारी डॉ. सुनिल सानप यांना घटनेची माहीती दिली. दरम्यान यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही महिन्यांपूर्वी बिबट्याने दिघीचारी परिसरात दहशत माजवली होती. आता बिबट्याने आपला मोर्चा थेट गावाकडे वळवला आहे. रात्री बिबट्याने गावात घुसून कुत्रा, शेळी अन् कोंबडी फस्‍त केल्‍याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तात्काळ वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांचे संरक्षण करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

हे हि वाचा : काय आहे श्रीकृष्ण अष्टमी साजरा करण्यामागचा इतिहास ?

- Advertisment -

ताज्या बातम्या