वडाळा महादेव |वार्ताहार| Wadala Mahadev
श्रीरामपूर (Shrirampur) येथील रेल्वे उड्डाणपुलावर काल (शनिवारी) रात्री ८ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण अपघात (Accident) घडला आहे. ज्यात ऊस वाहतूक (Sugarcane Transportation) करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली थेट एका स्विफ्ट डिझायर कारवर पलटी झाली. या भयानक अपघातात (Accident) कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असला तरी, ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे कारमधील दोन्ही प्रवाशी सुदैवाने बचावले आहेत.
नेवासा येथील आसिफ अहमद शेख आणि आरिफ मोहंमद शेख हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने (क्रमांक एम.एच. १२ एम.बी. ८२६४) नेवाशाच्या दिशेने निघाले होते. गाडी श्रीरामपूर रेल्वे उड्डाणपुलावर (Shrirampur Railway Flyover) आली असता, अचानक ऊसाने भरलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या कारवर पलटी झाली. ट्रॉलीच्या वजनाने कारचा वरील भाग पूर्णपणे चेपला गेला. मात्र, या भीषण परिस्थितीतही आसिफ आणि आरिफ हे दोघेही सुदैवाने बचावले आहेत.
श्रीरामपूरचा (Shrirampur) हा रेल्वे उड्डाणपूल सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे. पुलाच्या दयनीय अवस्थेमुळे येथे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. अवघ्या १० दिवसांपूर्वीच याच पुलावर एका ट्रकखाली सापडल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा हा थरारक अपघात घडला आहे.
उड्डाणपुलाच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे हा पूल आता ‘वाहतुकीसाठी’ नसून ‘मृत्यूचा सापळा’ बनल्याची संतापजनक प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने वेळीच जागे होऊन पुलाची दुरुस्ती न केल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही





