मुंबई | Mumbai
राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटवर (Siddhant Shirsat) एका विवाहित महिलेने फसवणूक, मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप एका वकीलामार्फत केला होता. त्यानंतर आता या महिलेने केलेले आरोप मागे घेतले आहेत. याबाबतची माहिती त्या महिलेने माध्यमांशी संवाद साधत दिली.
या महिलेने म्हटले की, “हे आपलं घरगुती प्रकरण आहे, याप्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण (Political) करू नये. संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते.सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोपमी मागे घेते.हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन कुणीही राजकारण करू नये. या प्रकरणाला मी फुलस्टॉप देत आहे. माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन कुणीही राजकारण करू नये”, असे तिने सांगितले.
पुढे त्या महिलेने म्हटले की, “सोशल मीडियावर (Social Media) किंवा माझ्या नावाने कोणीही राजकारण केले तर मी कायदेशीर कारवाई करणार असा इशाराही या महिलेने दिला आहे. शिरसाट साहेबांचा मी सन्मान करते, त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. त्यांनी कधीही फोन केला नाही. हे प्रकरण मला संपवायचे असून, मला यात गुंतून न पडता पुढे जायचे आहे “, असेही ती महिला म्हणाली आहे. तसेच सिद्धांत शिरसाट यांना पाठवलेली नोटीस (Notice) मी परत घेणार आहे, अशी माहितीही या महिलेने दिली.
महिलेने नोटीसमध्ये नेमकं काय म्हटले होते?
या पीडित महिलेने आपल्या वकिलाच्या मार्फत सिद्धांत शिरसाट यांच्या नावाने नोटीस दिली होती. या नोटीशीत त्यांनी माझा शारीरिक तसेच मानसिक छळ करण्यात आला आहे, असा आरोप केला होता. तसेच लग्न करण्यासाठी मला सिद्धांत शिरसाट यांनी वेगवेगवळ्या माध्यमातून धमकावले असल्याचेही त्यांनी या नोटीसमध्ये म्हटले होते. याशिवाय सात दिवसांच्या आत मला नांदायला न नेल्यास मी वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करणार आहे”, असा इशाराही या महिलेने सिद्धांत शिरसाट यांना दिला होता.