सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
अवसायनात असलेल्या सिन्नर व्यापारी बँकेने शेतकर्यांना अव्वाच्या सव्वा कर्जाच्या वसुलीसाठी नोटिसा बजावल्या असून या अन्यायकारक नोटिसींच्या विरोधात ‘प्रहार’ संघटनेचे शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी बँकेसमोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.
शेतकर्यांच्या नावावर दुसर्यानेच कर्ज उचलल्याचा आरोप करीत असे कर्ज घेणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सहाय्यक निबंधक तथा बँकेचे अवसायक संदीप रुद्राक्ष यांना देण्यात आले.
शेतकर्यांना व्यापारी बँकेकडून वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात 50-60 हजारांचे कर्ज घेतले असतांना 50-60 लाखांच्या थकबाकीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचा शेतकर्यांचा आरोप आहे. शेतकर्यांच्या नावावर लाखो रुपयांचे बोगस कर्ज उचलणार्यांचा धिक्कार असो, जप्ती वसुली थांबलीच पाहीजे, कर्जमाफी झालीच पाहीजे यासह विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. रुद्राक्ष यांची भेट घेऊन त्यांना शेतकर्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकर्यांच्या नावावर ज्यांनी कर्ज घेतले, त्यांच्याकडून कर्ज वसूल करावे यासह विविध मागण्या त्यात आहेत. शेतकर्यांना वसुलीच्या नावाखाली मानसिक त्रास देऊ नये अशी मागणी करतांनाच येथे न्याय मिळाला नाही तर मुंबईत जाऊन मातोश्रीसमोर शेतकर्यांना घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी दौलत धनगर, संदिप लोंढे, बापू सानप, सुनील जगताप, सुनील गर्जे, शिवाजी गुंजाळ, भास्कर उगले, सुरेश सानप यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.