देवगाव | वार्ताहर Devgaon
देवगाव व परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचा वाढता प्रादुर्भाव नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरत असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री देवगाव येथील किशोर दत्तु बोचरे यांच्या गट नंबर ८०/२ मधील शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात अंदाजे सहा वर्षे वयाचा नर बिबट्या जेरबंद झाला. विशेष म्हणजे, बुधवार (दि.८) जानेवारी रोजी याच परिसरातील लगतच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला होता. अवघ्या दोन किलोमीटरच्या परिघात ६१ दिवसांत सहा बिबटे जेरबंद झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्यांच्या सततच्या हालचाली, पाळीव प्राण्यांवरील हल्ले आणि मानवी वस्तीच्या जवळील वावर लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार देवगाव, महादेवनगर, वाकद, शिरवाडे, कानळद, रुई, धानोरे व कोळगाव या गावांना संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र (रेड झोन) म्हणून घोषित करण्यात यावे, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी जेरबंद बिबट्याला तब्बल चार तास रोखून धरले.
यावेळी येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांनी घटनास्थळी येवून ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव सादर केल्यास तो जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणकडे तत्काळ पाठविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. त्यानंतर बिबट्याला म्हसरूळ येथील वन्यजीव संरक्षण केंद्रात हलविण्यात आले.
यावेळी उपसरपंच लहानु मेमाणे, पोलीस पाटील सुनील बोचरे, मनोहर बोचरे, किशोर बोचरे, भागवत बोचरे, राजेंद्र मेमाणे, संदीप बोचरे, नागेश्वर बोचरे, गोपीनाथ मेमाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या कारवाईत येवला प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, विंचूर वनरक्षक विजय दोंदे, गोपाल राठोड, पंकज नागपुरे, निफाड आधुनिक पथक सदस्य भारत माळी, सागर दुसिंग, विजय माळी, राहुल ताटे, असिफ पटेल, सुनील भुरुक आदींनी सहभाग घेत बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन हलविले.
पाळीव प्राण्यांवर हल्ले; नागरिक भयभीत
देवगाव परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, संदीप बोचरे यांचे वासरू, सचिन बोचरे यांचे वासरू तसेच पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. शिवाजी पवार यांच्या घराच्या ओट्यावरच बिबट्याने सुमारे तासभर ठाण मांडले होते. कानळद रस्त्यावर सोमनाथ कदम यांच्या शेळीच्या कळपावर हल्ला करून शेळीला घेऊन बिबट्या पसार झाला. या घटनांमुळे भीतीचे वातावरण असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.




