मुंबई | Mumbai
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील गंभीर त्रुटींवरून विरोधी पक्षांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांच्या शिष्टमंडळाने सलग दुसऱ्या दिवशीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत अतिशय खळबळजनक आणि गंभीर आरोप केला आहे. जयंत पाटील यांनी थेट संशय व्यक्त केला की, “महाराष्ट्र निवडणुकीचा सर्व्हर कोणीतरी दुसरंच चालवतंय.”
मतदार यादीतील चुका आणि तांत्रिक बाबींवरून आक्षेप घेण्यासाठी काल (मंगळवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन दिल्यानंतर आज (बुधवारी) शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी आयोगाला पुराव्यासह माहिती दिली आणि एक पत्रही दिले. त्यांनी मुरबाड मतदारसंघातील एका विशिष्ट घटनेचा उल्लेख केला. मुरबाडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदार यादीतील त्रुटी दाखवल्यानंतर, श्रीमती गुप्ता नावाच्या व्यक्तीचे नाव यादीतून काढण्यात आले. या घटनेचा दाखला देत जयंत पाटील यांनी अनेक थेट प्रश्न उपस्थित केले: “ही नावं कोणी काढली? कोणी स्थळ पाहणी केली? एकाच महिलेचे हे फोटो आहेत हे कोणी तपासायला सांगितले?” ते म्हणाले, “या सर्व घटनांवरून आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत की, महाराष्ट्र निवडणूक आयोगांचा सर्व्हर कोणीतरी दुसरं चालवतंय, याचा आम्हाला संशय आहे. या सर्व प्रकारातून राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाच्या हातात काही नाही, हे सिद्ध झाले आहे.”
जयंत पाटील यांनी सांगितले की, काल आम्ही केंद्रीय आयुक्तांना मतदार यादीतील अनंत चुका दाखवल्या. त्या चुका दूर करण्यासाठी निवेदन दिले. केंद्रीय आयुक्तांनी हे सर्व पुरावे केंद्राला पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. आज आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. अद्यापही अनेक लोक पत्त्यांवर राहत नाहीत, अशा चुकीच्या नोंदी मतदार यादीत समाविष्ट असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या विधानसभा निवडणुकीतही अनेक त्रुटी समोर आल्याची आठवण करून देत जयंत पाटील यांनी भीती व्यक्त केली. ते म्हणाले, “गेल्या विधानसभेला सगळ्या सिस्टिम मोडून काढल्या गेल्या आणि किती टक्के मतदान झालं हे देखील जाहीर केलं नाही. आम्ही आता ज्या मतदार याद्या पाहिल्या, जर याच याद्या वापरल्या जात असतील, तर तीच चूक पुन्हा होईल.” मतदार यादीतील घोळ दूर न केल्यास निष्पक्ष निवडणुका होणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.




