मुंबई | Mumbai
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (ICC Women’s ODI World Cup) स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्याचा थरार आटोपल्यानंतर महिला विश्वचषक स्पर्धा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना नवी मुंबई (New Mumbai) येथील डीवाय पाटील स्टेडियमवर आज (गुरुवारी) भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळविण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्याला दुखापतीचे ग्रहण लागले आहे.
सलामीवीर फलंदाज प्रतिका रावलने (Pratika Rawal) दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे बदली खेळाडू म्हणून शेफाली वर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे. यामुळे स्मृती मंधानासोबत सलामीवीर फलंदाज म्हणून हर्लिन देओल, अमंजयोत कौर शेफाली वर्मा हे फलंदाज संघात आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात स्मृती मंधानासोबत सलामीवीर फलंदाज म्हणून कोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यावर पावसाचे (Rain) सावट असल्याने राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद पुन्हा एकदा ताहलिया मॅगराथकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार अॅलिसा हिली दुखापतग्रस्त झाली आहे.साखळी फेरीत दोन्ही संघांच्या कामगिरी बद्दल बोलायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. संघाने ७ पैकी ६ सामने जिंकले असून, १३ गुणांची कमाई करत अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
दुसरीकडे भारतीय संघाने (Indian Team) पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध विजय संपादन करून विश्वचषक स्पर्धेमध्ये विजयी सलामी दिली होती.मात्र, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. परंतु, न्यूझीलंड विरुद्ध विजय संपादन करून भारतीय संघाने पराभवाची मालिका खंडित करून उपांत्य फेरीत दणक्यात आपले स्थान निश्चित केले होते. भारताने दोन वेळा अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला आहे. मात्र,पराभवाचाही सामना करावा लागला आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात ६० सामने खेळले गेले असून, भारताने ११ तर ऑस्ट्रेलियाने ४८ सामन्यात विजय संपादन केला आहे. तसेच महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये १४ सामने खेळविण्यात आले असून, भारतीय संघाने ३ आणि ऑस्ट्रेलियाने ११ सामन्यात विजय संपादन केला आहे. आजच्या सामन्यात अॅलाना किंग, अॅशले गार्डनर, बेथ मूनी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना या खेळाडूंवर विशेष लक्ष असणार आहे.




