मुंबई | Mumbai
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा महाअंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (India-South Africa Women’s World Cup final) यांच्यात आज (रविवारी) नवी मुंबई येथील डीवाय पाटील मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळविण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका प्रथमच अंतिम फेरीत खेळणार आहे. तर भारतीय संघाने २००५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१७ मध्ये इंग्लंड विरुद्ध अंतिम सामना खेळला असून, दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.
महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने (Australia) ७ आणि इंग्लंडने ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे. तसेच न्यूझीलंडने २००० मध्ये विजेतेपद पटकावले होते. भारतीय संघाला (Team India) मागील १२ वर्षांपासून आपल्या पहिल्या विजेतेपदाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचा इराद्याने भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाने प्रथमच अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे.
दक्षिण आफ्रिका संघ (South Africa Team) चोकर्सचा शिक्का पुसण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे तर दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद लॉरा व्होल्व्हा डार्टकडे असणार आहे. भारतीय संघाने डीवाय पाटील मैदानावर २ सामने खेळले असून, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिका यंदाच्या हंगामात प्रथमच या मैदानावर सामना खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकाने साखळी फेरीच्या सामन्यात ७ पैकी ५ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध १२५ धावांनी दणदणीत विजय संपादन करून दक्षिण आफ्रिकेने आत्मविश्वासाने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.दुसरीकडे भारतीय साखळी फेरीच्या सामन्यात पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड विरूध्द विजय संपादन केला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. तर बांगलादेश विरूध्दचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ५ गडी राखून विजय संपादन करून भारतीय संघाने अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित केला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये ३४ सामने खेळविण्यात आले असून,२० सामन्यांत भारत आणि १३ सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळविला आहे.तर १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.विश्वचषक स्पर्धेत ६ सामने खेळविण्यात आले असून, दोन्ही संघांनी ३-३ विजय संपादन केले आहेत.
सामन्यावर पावसाचे सावट
नवी मुंबईतील हवामानाच्या अंदाजानुसार, आज पावसाची शक्यता सुमारे ६३ टक्के आहे. तर संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत ही शक्यता ५० टक्क्यांपर्यंत असेल. याच मैदानावर भारत-बांगलादेशचा लीग सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आज भारत आणि आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण झाला नाही तर राखीव दिवशी म्हणजे सोमवार (दि.०३ नोव्हेंबरला) ठेवण्यात आला आहे.




