नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
आयपीएल २०२६ च्या रोमांचक टप्प्यात आज (गुरुवारी) क्रिकेटप्रेमींना एक जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे. अहमदाबादच्या भव्य श्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी ७.३० वाजता यजमान गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येतील. बाद फेरीच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा ठरणार आहे.
या हंगामात यापूर्वी जेव्हा हे दोन्ही संघ बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भिडले होते, तेव्हा यजमान आरसीबीने ५ गडी राखून गुजरातचा पराभव केला होता. उद्याच्या सामन्यात शुभमन गिलचा गुजरात संघ आपल्या घरच्या मैदानावर त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरेल. गुजरात टायटन्सचे नेतृत्व युवा फलंदाज शुभमन गिल करत आहे.
गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केल्यामुळे गुजरातचा आत्मविश्वास उंचावलेला असून, ते पाचवा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहेत. दुसरीकडे, आरसीबीची मदार रजत पाटीदार खेळाडूंच्या आणि वरिष्ठ कामगिरीवर असेल. गुजरातला सलग दुसऱ्यांदा धूळ चारून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने आरसीबीचे विराट सैन्य मैदानात उतरेल.
आमनेसामने
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या दोन संघांत एकूण ७ सामने झाले आहेत. यामध्ये ४-३ अशा निसटत्या फरकाने आरसीबीचे पारडे जड राहिले आहे.
मैदानावरील इतिहास
नरेंद्र मोदी स्टेडियमवर यापूर्वी झालेल्या एकमेव लढतीत आरसीबीने विजय मिळवला होता. ही आकडेवारी गुजरातसाठी चिंतेची तर आरसीबीसाठी जमेची बाजू ठरू शकते.
दृष्टीक्षेपात
- गुजरातचा प्रयत्नः चेन्नईला हरवल्यानंतर विजयाची लय कायम राखणे.
- आरसीबीचे लक्ष्यः बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित करणे.
- पिच रिपोर्ट – अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरू शकते, मात्र दवाचा परिणाम खेळावर होऊ शकतो





