Friday, July 5, 2024
Homeनगरसरकारमान्य वाळूतस्करीचा नंगानाच थांबवा

सरकारमान्य वाळूतस्करीचा नंगानाच थांबवा

मुळा-प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीचा आंदोलनाचा इशारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्याच्या उत्तर भागातील राहाता, राहुरी, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा व मुळा नदीपात्रातून प्रचंड वाळूउपसा सुरू आहे. या वाळू उपशामुळे प्रवरा परिसरातील शेती पूर्णपणे उजाड होणार आहे. शेतातील विहिरीही कोरड्या पडणार आहेत. पाण्याची पातळी खालवणार आहे. बंधार्‍यांना धोका निर्माण झाला आहे. बेसुमार वाळू उपशाचे मोजमाप होत नाही. हा सरकारमान्य वाळूतस्करीचा नंगानाच थांबवा, अशी मागणी करत मुळा-प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीने शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुळा-प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीचे पदाधिकारी अरुण कडू, भास्कर फणसे, आदिनाथ दिघे, बापूसाहेब दिघे, बाळासाहेब रवंदे, अरूण खर्डे, शामराव दडे आदींनी हा इशारा दिला आहे. मुळा व प्रवरा नदीतील वाळूउपसा थांबवण्यासाठी यापूर्वीही त्यांनी तहसीलदार व प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात माहिती देताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांनी सांगितले की, वाळू उपशाचे राज्य सरकारचे धोरण पूर्णपणे फसले आहे. शासनाच्या निर्णयातून प्रवरा परिसराला पूर नियंत्रणाची भीती दाखवण्यात आली आहे.

परंतु पूरनियंत्रण व वाळू उपसाचा कोणताही संबंध नाही. असाच प्रकार नदी खोलीकरणाबाबतही आहे. तोही खोटाच आहे. खोलीकरणामुळे काठाबाहेरच्या, काठापासून दूर असलेल्या विहिरींचे पुनर्भरण होण्याऐवजी तेथील पाणी नदीकडे खेचले जाणार आहे. पर्यायाने दूरच्या शेतातील विहिरीसुध्दा कोरड्या पडणार आहेत. त्यांची पातळी खालवणार आहे. हा वाळूउपसा पाण्याआडून केला जात आहे, त्यामुळे मोजमापाचा पत्ता लागत नाही. शेतकर्‍यांच्या माहितीनुसार 30 फुटापेक्षा जास्त खोलीचे खड्डे झाले आहेत. बंधार्‍यांना धोका निर्माण झाला आहे. बंधार्‍याप्रमाणेच नदीपात्रात अनेक शेतकर्‍यांच्या विहिरींचे सिमेंटचे कडे आहेत. हे कडेसुध्दा ढासळण्याची शक्यता असल्याचे श्री. कडू यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या