अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात बुधावारी झालेल्या पावसामुळे पाच तालुक्यातील 97 गावातील 995 शेतकर्यांचे 567 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या वादळी पावसात शेतकर्यांच्या फळबागांसह, भाजीपाला आणि चारा पिकांचे नुकसान झालेले आहे. यामुळे हे आता आसमानी संकटात सापडले आहे. जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ते रात्री उशीरापर्यंत झालेल्या वादळी पावसात नगर, पाथर्डी, कर्जत, नेवासा आणि शेवगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यात सर्वाधिक नुकसान हे नेवासा तालुक्यातील 36 गावात झालेले आहे. त्याखालोखाल शेवगावच्या 23 गावात, कर्जतच्या 22 गावात, पाथर्डीच्या 210 तर नगर तालुक्यातील सहा गावात पिकांचे नुकसान झाले आहे.
यात डाळिंब, संत्रा, पपई, सीताफळ, आंबा, मोसंबी, लिंबू, ड्रॅगन फ्रुट या फळ बांगासह कांदा, भुईमूग, टोमॅटो, शेवगा या भाजीपाला पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान हे नेवासे तालुक्यात सर्वाधिक नुकसान 261.8 हेक्टर क्षेत्रावरील बागा आणि भाजीपाला पिकांचे झाले आहे. त्यामुळे 354 शेतकरी बाधित झाले आहे. नगर तालुक्यातील 6 गावांना वादळाचा तडाखा बसला असून 5.40 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 16 शेतकरी बाधित झाले आहेत.
पाथर्डी तालुक्यातील 10 गावांना फटका बसला असून 58 शेतकरी बाधित झाले आहे. 19.4 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील 22 गावांमधील 300 शेतकरी बाधित झाले आहे. 137. 24 हेक्टरवरील फळबाग आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले. शेवगाव तालुक्यातील 23 गावांना फटका बसला असून 267 शेतकर्यांचे 163.3 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.





