जामखेड तालुका | प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत अटीतटीच्या वळणावर पोहोचली आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेडमध्ये दाखल होताच, त्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आक्रमक विरोधाला सामोरे जावे लागले. फडणवीस यांच्या ताफ्यासमोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
आमदार रोहित पवार आणि विधान परिषदचे सभापती राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनलेल्या या निवडणुकीत, भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी आले असता, ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी हातात घेतलेल्या फलकांवरून खोचक सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
निदर्शनांदरम्यान झळकवण्यात आलेल्या पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावर प्रश्न विचारण्यात आले होते, की
जामखेड च एमआयडीसी कुणी रोखली? जामखेडचा विकास निधी आणि अध्यात्मिक स्थळांचा निधी कुणी अडवला? जामखेडचा सीसीटीव्ही प्रकल्प का रखडला? सर्वात गंभीर आरोप म्हणजे, गुंडांना परदेशात कुणी पळवले?
यावेळी परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. निदर्शने करणाऱ्या शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख मयुर डोके, विधानसभा प्रमुख गणेश उगले, नितीन ससाने, योगेश शिंदे, संदीप उगले, संयोग सोनवणे यांच्यासह अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक आधीच ‘विकास विरुद्ध गुन्हेगार’ या मुद्द्यावर केंद्रित केली आहे. त्यातच रविवारी शहरात एका निनावी पत्राने खळबळ उडवून दिली होती. त्या पत्राची चर्चा थांबत नाही तोच, आता थेट गृहमंत्र्यांच्या दौऱ्यात हे पोस्टर्स झळकल्याने जामखेडमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे.




