नागपूर | Nagpur
राज्याचे यंदाचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुरु होऊन सहा दिवस झाले आहे. पण यंदाचे अधिवेशन केवळ एकाच आठवड्याचे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी, १४ डिसेंबरला अधिवेशनाची सांगता होणार आहे. यंदाच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे प्रश्न सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून सभागृहात मांडण्यात येत आहेत. पण बऱ्याचदा मंत्री आमदारांना उत्तर देण्यासाठी उपस्थित नसल्याने या कारणामुळे सभागृहात गोंधळ पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षातील आमदार विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव आणि सत्ताधाऱ्यांमधील आमदार, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीच विधानसभेतील कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अशातच, आज विधानसभेच्या कामकाजावेळी पुन्हा एकदा मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्षातील आमदार विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव आणि सत्ताधाऱ्यांमधील आमदार, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार सोबतच शिवसेना शिंदे गटाचे खासदार सुहास कांदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सुहास कांदेंचा संताप
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. या अत्याचाराप्रकरणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. मात्र लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर विधानसभेत उपस्थित नसल्याचे सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
तर, यावेळी सभागृहात शहराचे गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा उपस्थित होते, परंतु, या घटनेबाबतची ब्रिफींग मी घेतली नसल्याचे सांगत मंत्री कदम यांनी हात वर केले, ज्यानंतर ही लक्षवेधी पुढे ढकलण्यात येत असल्याचे तालिका अध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या आमदारांनी कामकाजाबाबत रोष व्यक्त केला.
मी भुजबळला पाडून इथे आलोय
ही लक्षवेधी पुकारण्यात आल्यानंतर त्यासंदर्भातील उत्तर देण्यासाठी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर हे सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे मला उत्तर हे गृहराज्यमंत्र्यांनीच द्यायला हवे, अशी मागणी कांदे यांनी केली. पण सध्या मंत्री हे विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला गेले असल्याने ही लक्षवेधी नंतर घेऊ, असे उत्तर तालिका अध्यक्षांकडून देण्यात आले. पण यावेळी मंत्री दादा भुसे हे तिथे उपस्थित असल्याने त्यांनी उत्तर देण्याचे ठरवलेले. मात्र, यामुळे संतापलेल्या आमदार कांदेंनी म्हटले की, मला गृहराज्यमंत्र्यांकडून उत्तर हवे आहे. खात्याकडून याबाबतचे उत्तर आले पाहिजे. आम्ही काही सातवी नापास नाही. मी भुजबळांना पाडून इथे आलेलो आहे, असे यावेळी कांदेंनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




