मुंबई । Mumbai
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली असून, त्यांच्यावर आता दोन मोठ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची धुरा होती. त्यांच्या निधनानंतर या जिल्ह्यांमधील विकासकामांना खीळ बसू नये आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता राहावी, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) आज दुपारी प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकत्वासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा आग्रह धरला होता.
अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) विधीमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड केली. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांच्याकडे आता केवळ जिल्ह्यांचे पालकत्वच नाही, तर अजित पवारांकडे असलेली महत्त्वाची खातीही सोपवण्यात आली आहेत.
खातेवाटपानुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. मात्र, अजित पवारांकडे असलेले ‘अर्थ आणि नियोजन’ हे अत्यंत महत्त्वाचे खाते तूर्तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. आगामी अर्थसंकल्पानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याची जबाबदारी दिल्याने बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणांवर त्यांचा प्रभाव पडणार आहे. अजित पवारांनी सुरू केलेले विकासप्रकल्प पूर्ण करणे आणि पक्षाची पकड मजबूत ठेवणे, हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे.





