मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कुठे महत्व द्यायचं?” असं म्हणत तटकरेंनी हाकेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली.
लक्ष्मण हाके यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की, अजित पवारांनी ओबीसी समाजासाठीच्या निधीवर अडथळा आणला आहे. अर्थखात्यावर ते चिकटून बसले आहेत आणि त्यांच्या कारभारामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, असा दावा त्यांनी केला होता. इतकंच नव्हे तर “मी बोलायला लागलो तर अजित पवारांची कपडेही उरणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला होता.
या आरोपांवर उत्तर देताना सुनील तटकरेंनी म्हटलं की, “राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात आणि कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की कोणत्याही खात्याचा निधी दुसऱ्या खात्यात वळवण्यात आलेला नाही, किंवा कोणत्याही खात्याचा निधी कमी झालेला नाही. त्यामुळे अशा निराधार आरोपांना कुठेही स्थान नाही.”
तटकरे पुढे म्हणाले, “अजितदादा पवार हे राज्याचे अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून अत्यंत कुशलतेने काम करत आहेत. त्यांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सार्वजनिकरित्या समाधान व्यक्त केलं आहे. त्यामुळे हाके, डाके, पडळकर यांच्यासारख्या लोकांच्या वक्तव्यांना फारसं महत्व द्यायचं कारण नाही.”
तटकरे यांनी हाके यांच्यावर टीकास्त्र चालवत म्हणाले की, “आमचे प्रवक्ते त्यांना जी विशेषणे देतात, ती मी इथे उच्चारणारही नाही. पण त्यांची लायकी काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कोणाचा तोल कसा जातो आणि कुठे पडतो, हे जनतेने पाहिलं आहे.”