टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उप बाजार आवारातील कांदा व्यापार्याने खरेदी केलेला 15 टन लुज कांदा गोडावूनमध्ये पावसाचे पाणी घुसून भिजल्याने व्यापार्याचे मोठे नुकसान झाले. उपबाजार व्यवस्थापनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याने या व्यापार्यास हा आर्थीक फटका बसला आहे.
टाकळीभान येथे सोमवारी झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी कांदा व्यापारी दादाराव आघम यांच्या गोडावूनमध्ये शिरले. लुज कांदा खरेदी सुरु असल्याने आघम यांनी 15 टन कांदा खरेदी करुन गोडावून मध्ये टाकला होता. सोमवारी झालेल्या धो-धो पावसाने उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाणी वाहुन जाण्यासाठी नाली तयार करण्यात आलेली असली तरी पावसापूर्वी नाली साफसफाई बाजार समिती व्यवस्थापनाकडून करण्यात आली नसल्याने पाणी वाहुन जाण्याचा मार्ग बंद झाल्याने पावसाचे पाणी थेट आघम यांनी कांदा ठेवलेल्या गोडावूनमध्ये शिरले. पाण्याचा जोर जास्त असल्याने संपूर्ण कांदा पाण्यावर तरंगत संपूर्ण गोडावूनमध्ये पसरला गेला. हा कांदा रात्रभर पाण्यावर तरंगत होता.
टाकळीभान उपबाजार आवारात पावसाचे पाणी जाण्यासाठी दोन ठिकाणी सुविधा करण्यात आलेल्या आहेत मात्र, पाणी जाण्याच्या मार्गाची उपबाजार व्यवस्थापनाकडून साफसफाई झाली नसल्याने पाणी बाहेर न जाता आवारात साचले व हे पाणी गोडावूनमध्ये शिरले. व्यापार्याने रविवारी खरेदी केलेला लूज 15 टन कांदा भिजल्याने या व्यापार्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कांदा व्यापारी हे बाहेर गावचे असल्याने ते या ठिकाणी वेळेवर पोहचू न शकल्याने कांदा पाण्यात भिजून खराब झाला आहे.
घटनेनंतर बाजार समितीने तातडीने जेसीबीच्या साह्याने पाणी काढून देण्यासाठी हालचाल करून पाणी काढले व बंद झालेला पाण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र, हे काम अगोदरच केले असते तर या व्यापार्याचा कांदा भिजून नुकसान झाले नसते व व्यापार्याचेही नुकसान टळले असते. अशा प्रतिक्रिया व्यापार्यानमधून व्यक्त करण्यात आल्या.